ETV Bharat / bharat

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची 'ही' आहेत 5 कारणे

author img

By

Published : Sep 28, 2021, 10:25 PM IST

Updated : Sep 29, 2021, 2:07 PM IST

नवज्योत सिंग सिद्धू यांनीदेखील पंजाब काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबच्या भविष्याबाबत तडजोड करणार नसल्याचे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच काँग्रेसमध्ये काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या राजीनाम्याची पाच कारणे असल्याचे बोलले जात आहे.

नवज्योतसिंग सिद्धू
नवज्योतसिंग सिद्धू

चंदीगड - माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादामुळे पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा दुफळी असल्याचे चित्र झाले आहे. दोघातील वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतरही पंजाबमधील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी अचानक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसने पंजाबच्या मुख्यमंत्री पदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. अशातच नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांनीदेखील पंजाब काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबच्या भविष्याबाबत तडजोड करणार नसल्याचे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच काँग्रेसमध्ये काम सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-हरियाणाच्या पलवल जिल्ह्यात आईवडिलांसह एकाच कुटुंबातील ५ जणांची आत्महत्या

हे आहेत नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची कारणे-

  1. मुख्यमंत्री पदी निवड होण्यात अपयश -

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पद मिळेल, अशी नवज्योत सिंग सिद्धूंना आशा होती. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग यांच्या मुख्यमंत्री पदावरील निवडीला विरोध केला. एवढेच नव्हे तर सिद्धू हे देश आणि पंजाबला धोका असल्याचा आरोप केला. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने सिद्धू यांची मुख्यमंत्री पदी निवड केली नाही. असे असले तरी नवज्योत सिंग हे त्यांच्या पसंतीचे चरणजित सिंग यांची मुख्यमंत्री पदी निवड करण्यात यशस्वी ठरले. मात्र, स्वत:ला मुख्यमंत्री पद मिळाले नसल्याने नवज्योत सिद्धू हे नाराज झाले.

संबंधित बातमी वाचा-दिल्लीमध्ये अमित शाह यांची कॅप्टन भेट घेणार का ? ट्विट करून अमरिंदर यांनी दिले स्पष्टीकरण

2.पोलीस प्रमुखांची निवड करताना सिद्धूंच्या मताकडे दुर्लक्ष -

मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर चरणजीत सिंग यांनी स्वत:हून निर्णय घेण्यास सुरुवात केली. सिद्धू यांची अशी धारणा होती की, मुख्यमंत्री चरणजीत सिंग हे त्यांचे मत विचारात घेतील. मुख्यमंत्र्यांनी आयपीएस अधिकारी इक्बाल प्रीत सिंग साहोता यांची पंजाबच्या अतिरिक्त डीजीपी पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती करताना नवज्योत सिद्धूंचे मत मुख्यमंत्र्यांनी विचारात घेतले नाही.

संबंधित बातमी वाचा-नवज्योत सिंग सिद्धूंचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; अमरिंदर सिंग यांनी लगावला टोला

3. राज्याच्या महाधिवक्त्याच्या नियुक्तीवरून सिद्धू नाराज

पंजाबचे महाधिवक्ता पदी अनमोल रतन सिद्धू यांची निवड करावी, अशी नवज्योत सिंग सिद्धू यांची अपेक्षा होती. मात्र, चरणजीत सिंग यांनी एपीएस देओल यांची महाधिवक्तापदी निवड केली.

4. राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटप

पंजाब मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खातेवाटपात मुख्यमंत्र्यांहून वरचढ ठरण्याचा प्रयत्न सिद्धू यांनी केला. मात्र, हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले. हे करताना नवज्योत सिंग यांचे मत विचारात घेतले नसल्याचे बोलले जात आहे.

5. गृहमंत्रालयावर प्रभाव दाखविण्याचा अपयशी प्रयत्न

सुत्राच्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू यांनी गृहमंत्रालयावरदेखील प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी सुखजिंदर सिंग रंधवा यांच्याकडे सोपविली. रंधवा हेदेखील पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते.

Last Updated :Sep 29, 2021, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.