नवी दिल्ली - महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारने पाऊल उचलले आहे. आपण महिलांना रिक्षा, गाडी चालवताना पाहिले आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील राज्य महामंडळाच्या बसेस महिला चालवणार आहेत. 21 ऑगस्ट म्हणजे आज, राज्यातील कौशाम्बी जिल्ह्यामध्ये बस चालक पदासाठी महिलांची निवड केली जाणार आहे.
राज्यातील बसेस चालवण्यासाठी पहिल्यांदाच महिलांची निवड करण्यात येत आहे. महिला चालक ज्या बस चालवणार आहेत. त्या बसेस निर्भया निधीमधून खरेदी करण्यात आल्या आहेत. बस चालक महिला असल्याने प्रवासी महिलांमध्येही सुरक्षतेची भावना राहील. तसेच यामुळे महिला सबलीकरणासही प्रोत्साहन मिळेल , असे गाझियाबाद आगार व्यवस्थापक अखिलेश सिंह यांनी सांगितले. या स्पेशल बसेसमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच या बसमध्ये एक आपातकालीन बटन आहे.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये बेस्ट बसेस चालकांसाठी महिलांची निवड केली होती. या महिलांना बस चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना सुरुवातील छोट्या अंतरावरील बसेस चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर लांब पल्ल्याचा मार्गावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.