श्रीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील 'भारत जोडो यात्रा' आता प्रवासाच्या अंतिम टप्यात पोहचली आहे. भारत जोडो यात्रेने काश्मीरमध्ये प्रवेश करून शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली आहे. यात्रेने शुक्रवारी सकाळी बनिहाल येथून काश्मीर खोऱ्याकडे प्रस्थान केले आहे. हे दोन्ही प्रदेश 11 किलोमीटरच्या नवयुग बोगद्याद्वारे जोडलेले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील बनिहाल येथे या यात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था : काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था केली आहे. यात्रा काझीगुंडजवळील कुजरू गावात पोहोचताच शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिचे स्वागत केले. घोषणाबाजी करणार्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याला चाप लावण्यासाठी बराच वेळ लागला. खोऱ्यातील सुरक्षेच्या सल्ल्याने राहुल गांधी त्यांच्या समर्थकांमध्ये मिसळण्यासाठी त्यांच्या वाहनातून उतरले नाहीत. यात्रेचे कव्हरेज करणार्या वार्ताहारांना देखील ताफ्यातील मोबाईल फ्रिक्वेन्सी जॅमरमुळे सेलफोनशी संपर्क साधता आला नाही.
यात्रेची शेवटच्या मुक्कामाकडे वाटचाल : कुजरू गावात थोडावेळ थांबून ही यात्रा अनंतनागच्या दिशेने निघाली. राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी नेते अनंतनागमध्ये माध्यमांना संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी दरड कोसळण्याची भीती लक्षात घेऊन यात्रा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र, आज सकाळी बनहाल येथून यात्रा सुरू झाली असून, खोऱ्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ती आपल्या शेवटच्या मुक्कामाकडे वाटचाल करत आहे.
फारुख अब्दुल्ला काय म्हणाले : नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा उद्देश देशाला एकत्र आणणे आणि निवडणुकीतील फायद्यासाठी समुदायांमध्ये द्वेष पसरविण्याविरुद्ध आहे. एकमेकांच्या हितासाठी लोकांनी एकत्र येण्याच्या गरजेवर भर देत फारूक म्हणाले की, द्वेषामुळेच आपत्ती येते. ते अनंतनाग जिल्ह्यातील औषमुकाम येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले, 'देशाला एकत्र आणणे आणि द्वेषाची भिंत तोडणे हे यात्रेचे ध्येय आहे. जोपर्यंत आपण संघटित होऊन एकमेकांच्या हिताचा विचार करत नाही तोपर्यंत आपण आपल्या राष्ट्रनिर्मात्यांच्या स्वप्नाप्रमाणे देश घडवू शकणार नाही, हाच या पदयात्रेचा संदेश आहे. फारुख अब्दुल्ला शोक सभेत सहभागी होण्यासाठी दक्षिण काश्मीरमधील गावात पोहोचले होते.
हेही वाचा : Sanjay Raut News : विरोधकांनी भारत जोडो यात्रेत केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे - संजय राऊत