श्रीनगर - देशभरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये ढगफुटी झाली आहे. यामध्ये 36 जण बेपत्ता असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. किश्तवारमधील होजार गावात ढिगाऱ्याखाली चार मृतदेह आढळले. तर 8 ते 9 घरांचे नुकसान झाले आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी टि्वट करून 30 ते 40 जण बेपत्ता असल्याची माहिती दिली आहे. एसडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पाऊस सुरू असून संपर्कसेवा ठप्प झाली आहे. किश्वतवारमध्ये ढगफुटी झाल्याने जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांकडून परिस्थिती माहिती करून घेतल्याचे गृह मंत्री अमित शाह यांनी टि्वट करून सांगितले. तसेच त्यांनी पीडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली.
जम्मूत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जुलैच्या शेवट्या आठवड्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. यानुसार किश्तवारमधील तलावाच्या काठावरील लोकांना सर्तक राहण्याची सूचना देण्यात आली होती. येत्या काही दिवसातही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नदी-नाल्यांचे जलस्तर वाढू शकते.
देशातील इतर भागांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे 200 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये परिस्थिती बिघडली असून महापूर आला आहे. तर हिमाचलमध्येही ढगफुटी झाली असून लाहौल-स्पीतिमध्ये 10 जण बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तर किन्नौरच्या रकच्छम गावातील नदीला पूर आल्याने भंयकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सर्वात मोठी ढगफुटी -
यापूर्वी 6 ऑगस्ट 2010 रोजी भारतातील जम्मू आणि कश्मीरच्या लद्दाख आणि लेहमध्ये ढग फुटीच्या घटनेने संपूर्ण लेह शहराचे नुकसान झाले होते. या घटनेत 115 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर 300 हून अधिक जखमी झाले होते. जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते.