महाराष्ट्र

maharashtra

भाजपा हा xxखाऊंचा पक्ष! अब की बार, भाजपा तडीपार; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका - Uddhav Thackeray

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 9:17 PM IST

Updated : Apr 12, 2024, 10:10 PM IST

Uddhav Thackeray : भाजपा हा XXखाऊंचा पक्ष असल्याचा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय. त्याचवेळी आम्हाला नकली शिवसेना म्हणायला ही काय मोदींची पदवी आहे का? असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेली लगावला. ते शुक्रवारी (दि. 12 एप्रिल) पालघरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचे भाषण

पालघर Uddhav Thackeray : बाहेरून येऊन शिवसेना नकली आहे असे सांगणाऱ्यांनी नकली पदव्यांचे कारखाने सुरू केले आहेत का? अशी विचारणा करत चीन, पाकिस्तानसारख्या देशाच्या शत्रुराष्ट्रापुढे शेपटी घालता आणि विश्वगुरू समजणारे आमच्याकडे येऊन फणा काढतात, अशी थेट टीका करून एकपक्षीय हुकूमशाहीचे सरकार या निवडणुकीत गाडून टाकू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी बोईसर येथे प्रचारसभा आयोजित केली होती. त्यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह फुटीर शिवसेना आणि अजित पवार यांच्यावर टीका केली.

इकडे फणा, तिकडे शेपूट : देशात मजबूत सरकार शत्रूंचा नायनाट करण्यासाठी निवडून दिलं होतं. परंतु, सीमेवरचे शत्रू बळकट होत असताना हे मात्र आमच्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. इकडे आमच्यावर फणा काढणारे तिकडे मात्र शेपूट घालतात, असं म्हणत पूर्वी देशाच्या हितासाठी एकपक्षीय सरकार असले पाहिजे, असे मत होतं. परंतु, आता एकपक्षीय सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याने संमिश्र सरकार देशहिताचे आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

एक व्यक्ती गुलाम बनवायला निघाली : देशात कोणतेही सरकार हे त्या देशाचे असते किंवा पक्षाचे असते. परंतु, भाजपावाले देशापेक्षा मोठे व्हायला निघालेत. देशाच्या सरकारऐवजी मोदी सरकार म्हणायला लागले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी यांनी अचानक आठ नोव्हेंबरला टीव्हीवर येऊन उद्यापासून या नोटांचे कचरा तुकडे होतील, असं जाहीर करून जनतेला रस्त्यावर आणलं. त्याच मोदींचे नाणे बनावट असून आता त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. मोदींचे नाणे आता चालणार नाही, असा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला आहे.

विकास कामांबाबत आव्हान : या वेळी ठाकरे यांनी मोदी यांना कोणी किती विकासकामे केली हे जनतेसमोर येऊन सांगण्याचे थेट आव्हान दिलं. मी माझ्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील कामाची माहिती देतो. मोदी यांनीही जनतेसमोर येऊन त्यांच्या गेल्या दहा वर्षाच्या कामाची माहिती जनतेला सांगावी आणि मग जनता काय ठरवेल ते आपल्याला मान्य असेल, असं सांगून देशापेक्षा एखादी व्यक्ती मोठी होते आणि ती सगळ्याच देशाला गुलाम बनवते हे चित्र आता चालणार नाही, अशा शब्दांत मोदी यांचा खरपूस समाचार घेतला.

Last Updated : Apr 12, 2024, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details