सांगली Sanjay Raut On Devendra Fadnavis : "देशातील निवडणूक आयोग हा पंतप्रधान मोदींच्या पगडीत गुदमरला आहे. पाकिस्तानच्या लष्करी राजवटीप्रमाणं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून निवडणूक आयोगानं माती खाल्ली आहे," अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर सहा ते सात टक्के मतदान 11 दिवसांनी वाढलं, असा गंभीर आरोप देखील निवडणूक आयोगावर संजय राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांचा तो स्फोट नसून लवंगी फटाका :एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, असा गौप्यस्फोट केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगवाला आहे. "देवेंद्र फडणवीसांचा तो स्फोट वगैरे काही नसून लवंगी फटाका आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस भरटकल्यासारखं बोलत आहेत. ते निवडणूक हरतायत राजकारण हरतायत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. आता ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत," अशी टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.