महाराष्ट्र

maharashtra

14 दिवसांत 10 हत्या! गृहमंत्र्यांच्या शहरात चाललंय तरी काय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 9:22 AM IST

Nagpur Crime : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहराला पुन्हा एकदा गुन्हेगारांनी विळखा घातला आहे. दोन वर्षापूर्वी शहरात शून्य हत्येची नोंद झाली होती. मात्र आता गेल्या 14 दिवसांत तब्बल 10 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Nagpur Crime
Nagpur Crime

नागपूर Nagpur Crime : नागपूरला राज्याच्या उपराजधानीचा दर्जा जरी असला तरी गुन्हेगारीच्या बाबतीत मात्र शहर राज्याची राजधानीचं ठरत आहे. गृहमंत्र्यांच्या शहरात गेल्या 14 दिवसांत तब्बल 10 हत्येच्या घटना उघडकीस आल्या. त्यात दोन दुहेरी हत्याकांडाचाही समावेश आहे. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे अद्याप आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत. किंबहुना गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचं चित्र आहे.

दोन वर्षांपूर्वी शून्य हत्येची नोंद : दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात नागपूर शहरात शून्य हत्येची नोंद झाली होती. मात्र यंदा हत्येच्या घटनांचे जुने सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहरामध्ये वर्षभरात घडणाऱ्या हत्येच्या घटनांच्या विचार केला तर, पाच वर्षांपूर्वी हा आकडा सरासरी शंभर इतका होता. गेल्या काही वर्षात हत्येच्या घटनांमध्ये बरीच घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी नागपुरात 76 खुनाच्या घटना घडल्या होत्या.

या महिन्यात 10 हत्या : डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी 1 फेब्रुवारीला नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्याच्या अवघ्या 12 तासात शहरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैश्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड घडलं. तेव्हापासून सुरू झालेली हत्येची मालिका अद्यापही थांबलेली नाही. 4 फेब्रुवारी रोजी वाठोडा भागात वर्चस्वाच्या वादातून दोघांनी एका इसमाचा खून केला. त्यानंतर 9 फेब्रुवारीला नंदनवन भागात उधारीच्या पैशातून उद्भवलेल्या झालेल्या वादातून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. 10 फेब्रुवारीला क्रिकेटच्या वादातून एका तरुणाची हत्या झाली. तर 12 फेब्रुवारीला मित्राच्या प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या झाली.

पाच वर्षात 416 हत्येच्या घटना : नागपूर शहर क्षुल्लक कारणांवरून घडणाऱ्या खुनाच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध आहे. शहरात महिन्याला सरासरी 8 ते 10 हत्येच्या घटना घडतात. गेल्या पाच वर्षात तब्बल 416 हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. 2023 साली 76 खुनाच्या घटनांची नोंद झाली होती. तर 2022 मध्ये हा आकडा 65 इतका होता. 2021 मध्ये शहरात 95 खून झाले तर 2020 मध्ये 97 आणि 2019 मध्ये 83 खून झाले.

फेब्रुवारी 2022 मध्ये झिरो मर्डर :फेब्रुवारी 2022 मध्ये नागपूर शहरात एकाही हत्येची नोंद झाली नव्हती. नागपूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं होतं. त्यावेळी नागपूर पोलिसांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. मात्र, त्यानंतर पोलीस हा रेकॉर्ड कायम राखू शकले नाहीत. किंबहुना तेव्हापासून सातत्यानं गुन्हेगारी वाढत असून नवनवीन गुन्हेगार उदयास येत आहेत.

हे वाचलंत का :

  1. दुचाकी चोरण्यात प्राविण्य प्राप्त अट्टल चोराला अटक; तब्बल १११ दुचाकी जप्त
  2. नागपुरात तब्बल 'इतके' कुणबी प्रमाणपत्र वितरित, जिल्ह्यात कुणबी-मराठा केवळ एक जात प्रमाणपत्र
  3. नागपुरच्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत 'राम आयेंगे' गाण्यावर डान्स, व्हिडिओ तुफान Viral

ABOUT THE AUTHOR

...view details