महाराष्ट्र

maharashtra

"...असले साप उशाला घेऊन झोप येणार नाही", नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव? वाचा सविस्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 9:37 PM IST

Bhaskar Jadhav Speech : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. तसंच भास्कर जाधव भाजपामध्ये जाणार असल्याचेही दावे करण्यात येत आहेत. पण हे सर्व दावे फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, असं असलं तरी चिपळूणमध्ये झालेल्या या सभेत बोलत असताना भास्कर जाधव यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली.

Shivsena Thackeray Group MLA Bhaskar Jadhav talk on Disputes within party during speech at Chiplun
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव

भास्कर जाधव चिपळूण सभा

रत्नागिरी Bhaskar Jadhav Speech : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडं महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडं ठाकरे गटाची गळती थांबायला तयार नाही. असं असतानाच शनिवारी (9 मार्च) कोकणातील ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केलं होतं. या पत्रात त्यांनी माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण झाल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार का? अशा आशयाच्या चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळालं. मात्र, असं असतानाच आज (10 मार्च) चिपळूण येथे पार पडलेल्या सभेत भास्कर जाधवांनी या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव? : यावेळी आपल्या भाषणात भास्कर जाधव म्हणाले की, "माझ्या सहकाराऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. जेव्हा संघर्ष करायची वेळ असते, तेव्हा भास्कर जाधव स्वतः समोर उभा असतो. माझ्याबाबतीत संभ्रम निर्माण केला गेलाय. आमच्या पक्षप्रमुखांबद्दल जे बोललं जातं ते योग्य आहे का? भाजपाचे बॅनर लागले, तेव्हा भास्कर जाधवच्या पाठीशी 40 वर्षांची पुण्याई उभी राहिली. पण जे घरभेदी आहेत त्यांनी थोडासा संभ्रम निर्माण केला." तसंच उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले. त्यामुळं ते साप नक्की कोणाला म्हणालेत, याविषयी आता तर्क-वितर्क काढले जात आहेत.


पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दासाठी मी लढतोय : पुढं ते म्हणाले की, "जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा, उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि मी मुंबईला वर्षावर गेलो. यावेळी सर्वांची आपलं मत व्यक्त केलं. तेव्हा मी म्हणालो की, उद्धव साहेब तुम्ही कुठंही जा पण जर भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर राहणार नाही. त्यावर बोलतांना सगळे गेले तरी चालतील पण आपण दोघांनी राहायचं असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षप्रमुखांना दिलेल्या या शब्दासाठी मी आजही लढतोय, पण माझ्याच पक्षातील काही लोक अफवा पसरवत आहेत. मात्र, काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचंय", असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण...; भास्कर जाधवांचं भावनिक पत्र, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?
  2. "आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरुन तयार होते, पण..."; आमदार योगेश कदमांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
  3. वाय दर्जाची सुरक्षा घेऊन काही लोक महाराष्ट्रात दंगा घडवू पाहत आहेत-भास्कर जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details