महाराष्ट्र

maharashtra

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सीएएची आठवण, नेहमीप्रमाणे हाही ‘चुनावी जुमलाच’ - रमेश चेन्नीथला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 7:21 PM IST

Ramesh Chennithala On BJP : मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी (11 फेब्रुवारी) पार पडली. यावेळी बोलत असताना कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधत जोरदार टीका केली. तसंच निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सीएएची आठवण होत असल्याचंही ते म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई Ramesh Chennithala On BJP : कर्नाटकात भारतीय जनता पक्षानं काँग्रेस पक्षाला कटकारस्थान करुन पाडले. त्यांचे सरकार स्थापन केले. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजपाचा पराभव केला. काँग्रेसला बहुतमतानं निवडून दिलं. महाराष्ट्रातील सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं नसून ईडी, सीबीआयचं हे सरकार आहे, असा घणाघात करत आगामी निवडणुकीत जनता या भ्रष्ट सरकारचा पराभव करुन काँग्रेसला विजयी करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

जनता भयभीत : बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, "महाराष्ट्रातील भ्रष्ट युती सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात पुर्णपणे अपयशी ठरलंय. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहमंत्र्यांचं आहे. परंतु 'गाडीखाली कुत्रा आली तरी विरोधक राजीनामा मागतील' असं विधान गृहमंत्र्यांनी केलंय. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखील वागळेंवर हल्ला करण्यात आला. नागपुरात खून आणि मुंबईत गोळीबाराच्या घटना घडल्या आहे. त्यामुळं जनता भयभीत आहे. परंतु सरकार, मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री उत्तर देण्यास तयार नाहीत. गुन्हेगारांवर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत खराब आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे."

जागा वाटपावरून मतभेद नाहीत :पुढं ते म्हणाले की, "राज्यातील विभागवार आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा नुकताच पूर्ण केला आहे. आता 16 आणि 17 फेब्रुवारीला लोणावळा येथे शिबीर होत आहे. या शिबीरातही निवडणुकीच्या तयारीवर चर्चा केली जाईल. तर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे या शिबीराचे ऑनलाईन उद्घाटन करतील. तसंच लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी महाविकास आघाडी मजबूतपणे मैदानात उतरणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. दिल्लीत एक आणि मुंबईत दोन बैठका झाल्या असून लवकरच अंतिम निर्णय होईल", असंही चेन्नीथला यांनी सांगितलं.



‘चुनावी जुमला’ : यावेळी रमेश चेन्नीथला यांना सीएए संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "निवडणुक आली की भाजपा अशी जुमलेबाजी करत असतो. हे विधेयक मंजूर होऊन काही वर्ष झाले. या वर्षभरात त्यांना ते लागू करावं असं का वाटलं नाही? ते आत्ताच का सीएएची चर्चा करत आहेत? याचं कारण म्हणजे त्यांना निवडणुकीत धार्मिक मुद्दा चर्चेत आणायचा आहे. सीएएला भाजापाशासित काही राज्यांचाही विरोध आहे. त्यामुळं सीएए हा केवळ ‘चुनावी जुमला’ आहे", असं चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील मोर्चांवर नाना पटोलेंनी केले भाष्य :राज्यात काही संघटना हिंदू आक्रोश मोर्चा काढत आहे, यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "हिंदूंचं सरकार आलं असं भाजपाचे लोक जाहीरपणे सांगत असतात. दिल्लीत आणि राज्यातही हिंदूंचंच सरकार आहे. खरंच असं असेल तर मग हिंदू समाजाला आक्रोश मोर्चा का काढावा लागतोय? या सरकारनं महागाई, बेरोजगारी वाढवून हिंदूंचं नुकसान केलंय. हिंदू धर्माचे चारही शंकराचार्य भाजपा सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहेत. प्रभू रामचंद्राच्या नावाखाली भाजपानं जे राजकारण केलंय त्यावर शंकराचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. खरे साधू संत हे भाजपाच्या विरोधातच आहेत", असंही पटोले म्हणाले.

हेही वाचा -

  1. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध नाशिक युवक कॉंग्रेस आक्रमक, गृहमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
  2. शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जिथे पवार तिथे पक्ष - जयंत पाटील
  3. घोडेबाजार टाळण्याकरिता काँग्रेसची तयारी, नितीश कुमारांच्या फ्लोअर टेस्टपूर्वी आमदारांना हैदराबादला हलवलं!

ABOUT THE AUTHOR

...view details