महाराष्ट्र

maharashtra

संभाजीराजेंसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा, कोल्हापूर लोकसभेबाबत लवकरच निर्णय - आमदार सतेज पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 7:45 PM IST

Lok Sabha Elections 2024 : स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी स्वराज्य पक्षालाच प्राधान्य दिल्यानं महाविकास आघाडीत चलबिचल वाढली आहे. मात्र संभाजी राजेंची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून याबाबत ते लवकरच श्रीमंत शाहू महाराजांशी भेट घेऊन निर्णय घेतील, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.

MLA Satej Patil
आमदार सतेज पाटील

लोकसभा निवडणुकीबाबत सतेज पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला

कोल्हापूर Lok Sabha Elections 2024 :कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीबाबत अजून महायुतीने पत्ते खोलले नाहीत. तसंच कोणते पक्ष किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट नाही. महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या असून महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी 10 तारखेचा मुहूर्त ठरला आहे. जागा वाटप झाल्यानंतरच दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत काही अडचण असणार नाही."

पुढं ते म्हणाले, "कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दावा आहे, हा दावा स्वाभाविक आहे. मात्र, कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठांना कळवण्यात आलय. आता कोल्हापूरची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार यावर ती जागा ठरेल, काँग्रेस पक्षाकडे जागा आली तर चांगलाच उमेदवार दिला जाईल." तसंच कोल्हापुरात आमच्याकडे जागा राहावी यासाठी आग्रही असल्याचंही सतेज पाटील यावेळी म्हणाले.



राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचंच नियंत्रण नाही : कल्याणचेभाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री घडली. यानंतर यावरुन विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यावर प्रतिक्रिया देत सतेज पाटील म्हणाले, "राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर कोणाचेच नियंत्रण नाही, आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करत असेल तर सामान्य माणसाने आशेने कोणाकडे बघायचं? सत्ताधारी राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करताय. तीन पक्षाचं सरकार असल्यानं कोण सरकार चालवतंय हेच कळत नाही. अधिकाऱ्यांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही, राज्याची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे." तसंच मुख्यमंत्र्याची गुंडगिरी आहे असं आमदार म्हणत असेल तर याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. हा वाद लोकांच्या हितासाठी झाला की एखाद्या जागेसाठी? याचा खुलासा व्हायला हवा.

हेही वाचा -

  1. संभाजीराजे 'स्वराज्य'वर ठाम, महाविकास आघाडीची होणार अडचण?
  2. लोकसभा पराभवाच्या जखमा अजून विसरलो नाही- छत्रपती संभाजीराजे
  3. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वेदनादायक - छत्रपती संभाजीराजे

ABOUT THE AUTHOR

...view details