महाराष्ट्र

maharashtra

आम्ही भाजपाला हटवणार! राहुल गांधींचा निर्धार; भाजपा देशात द्वेश पसरवत असल्याचा आरोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 9:18 PM IST

Jan Vishwas Rally : बिहार हे देशाच्या राजकारणाचं 'केंद्र' आहे. देशात जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा त्याची सुरुवात बिहारपासून होते. त्यानंतर हा बदल इतर राज्यांकडे जातो. आज देशात विचारधारेचा लढा सुरू आहे. एका बाजूला द्वेष, हिंसा आणि अहंकार आहे. तर, दुसरीकडे एकमेकांबद्दल प्रेम, बंधुभाव आणि आदर आहे. असं म्हणत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार घणाघात केला. ते आज रविवार (दि. 3 मार्च)रोजी पाटणा येथील गांधी मैदानात आयोजित 'जनविश्वास' सभेत बोलत होते.

गांधी मैदानात आयोजित 'जनविश्वास' सभा
गांधी मैदानात आयोजित 'जनविश्वास' सभा

पाटणा/बिहार :Jan Vishwas Rally : राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाना साधला. भाजपा आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत असल्याचा थेट आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. तसंच, जनतेवर अन्याय होत असल्याने देशात द्वेष पसरला आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत. देशातील तरुण, शेतकरी आणि गरिबांवर अन्याय होत असून मोदी सरकार केवळ 10-12 उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय. मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात देशातील काही निवडक उद्योगपतींचं तब्बल 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. मात्र, मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. सभेला, कांग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सपा प्रमुख अखिलेश यादव, सीपीआई-एमचे सीताराम येचुरी उपस्थित होते.

देशातील सर्व संपत्ती एका उद्योगपतीच्या हाती सोपवली : आज देशात 40 वर्षांत सर्वात जास्त बेरोजगारी आहे. कारण जे छोटे उद्योग रोजगार निर्माण करायचे ते मोदी सरकारने जीएसटी आणि नोटाबंदीच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले आहेत. सध्या देशात बड्या उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण होत आहे. नरेंद्र मोदींनी देशातील सर्व संपत्ती एका उद्योगपतीच्या हाती सोपवली आहे. भारताची बंदरं, रेल्वे आणि संरक्षण एका उद्योगपतीकडे सोपवण्यात आलं आहे असही ते यावेळी म्हणाले. तसंच, 'भारतातील 50 टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. दलित लोकसंख्येच्या 15 टक्के आणि आदिवासी 8 टक्के आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 73 टक्के आहे. आता भारतातील मोठ्या कंपन्यांची यादी काढा, त्यात तुम्हाला एकही यातील व्यक्ती सापडणार नाही असा थेट दावा त्यांनी केला आहे.

भाजप आणि आरएसएसला हटवणार : पूर्वी गरिबांना सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळायच्या. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व दरवाजे बंद केले. लष्करात अग्निवीर योजना राबवण्यात आली. या देशात पहिल्यांदाच दोन प्रकारचे शहीद होणार आहेत. शहिदांना पेन्शनसह इतर सर्व सुविधा मिळणार आहेत. तर, इतरांना पेन्शन किंवा शहीद दर्जा मिळणार नाही. एकीकडे पाकिस्तान आणि चीनचे सैनिक वर्षभर प्रशिक्षण घेतात. आमचे मोदीजी तरुणांना काही महिने प्रशिक्षण देऊन सीमेवर उभं करतात. हा अन्याय आहे असा आरोप करत आम्ही भाजप आणि आरएसएसला घाबरत नाही. आम्ही भाजप आणि आरएसएसला हटवणार असा निश्चय राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा : पाटणा येथील जनविश्वास महारॅलीमध्ये लालू यादव यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत त्यांच्यावर धर्मावरून जोरदार टीका केली. 'हे मोदी म्हणजे काय? मोदी ही गोष्ट आहे का? नरेंद्र मोदी अजिबात हिंदू नाहीत. आईचे निधन झालं तर मुलाने केस कापण्याची आपल्या देशात परंपरा आहे. मोदींनी सांगा ते केलं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच, तुम्ही देशभर द्वेष पसरवण्याचं काम करत आहात. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

ते पलटूराम आहेत : यावेळी लालू प्रसाद यादव यांनी जनविश्वास सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांवरही जोरदार टीका केली.'लगल झुलनिया के धक्का बलम कलकत्ता निकारी गए' या भोजपुरी गाण्यातून त्यांनी नितीश कुमारांवर खरमरीत टीका केली. नितीश यांचे नाव न घेता लालू म्हणाले, 2017 मध्ये जेव्हा नितीश कुमार महाआघाडीतून एनडीएमध्ये गेले तेव्हा आम्ही त्यांना काही बोललो नाही. मात्र, ते पलटूराम आहेत हे सत्य आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा आघाडीत घेण्याची चूक आम्ही करणार नाही. एकदा चूक केली होती ती आता होणार नाही असही ते म्हणाले आहेत.

जिथं आहात तिथं खूश राहा : आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चाचांनी पाठ फिरवली आहे. परंतु, आम्ही म्हणतो ते जिथे असतील तिथं आनंदी राहो असा टोला तेजस्वी यांनी नितीश कुमार यांना लगावला. तसंच, जे काम स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये झालं नाही, ते आम्ही सरकारच्या 17 महिन्यांच्या कार्यकाळात केलं असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

हेही वाचा :

1पंतप्रधान मोदींवर विश्वास म्हणजे विश्वासघाताची हमी-राहुल गांधी

2शेतकऱ्यांचा मागं न हटण्याचा निर्धार; 'या' तारखेला करणार दिल्लीकडं कूच

3पहिल्याच यादीत भाजपाचा हिरमोड; भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार

ABOUT THE AUTHOR

...view details