औरंगाबाद - पर्यावरण बचाव करण्यासाठी शाडू मातीची मूर्ती घरात किंवा मंडळात स्थापन करावी असे म्हणले जाते. मात्र विसर्जन ( Ganesh murti visarjan 2022 ) करताना विशेष काळजी घेतली नाही तर शाडू माती पर्यावरणास हानिकारक ठरू शकते. बाप्पाची शाडू मातीची जर मूर्ती स्थापित केली असेल तर कुठल्याही विहिरीत, तलावात, नदीत विसर्जित केली असता, ती माती मुळाशी घट्ट जाऊन बसते. झऱ्यांच्या तोंडाशी जाऊन बसल्यामुळे झरे बंद होतात. तसेच जमिनीत पाणी मुरत नाही. परिणामी जमिनीखालील पाण्याची पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतात. जर ही माती कुंड्यांना किंवा झाडांना टाकली तरी घट्ट जाऊन बसते. त्यामुळे मातीचा भुसभुशीतपणा नष्ट होऊन मुळांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते झाडे मरून सुद्धा जातात. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घ्यावी असे आवाहन दीपशिखा फाउंडेशन तर्फे ( Deepshikha Foundation ) करण्यात आले आहे. शाडू बाप्पाच्या शाडूच्या मूर्तीचं विसर्जन करायचं कसं? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर शाडू मातीची मूर्ती ही घरी बादलीतच विसर्जित करायची आणि मूर्ती विरघळल्यावर बरोबरचे पाणी झाडांना टाकून द्यायचे. खालची माती तशीच राहू द्यायची ती सुकू द्यायला हवी. त्याचाच दगड तयार होईल तो दगड तो तसाच ठेवायचा पुढल्या वर्षी पुन्हा त्याला थोडं बारीक करून पाणी शिंपडल्यावर माती तयार होते. तसे करून आपण मातीचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. अशी माहिती दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा चौधरी यांनी दिली.