पुणे : लव्ह जिहादबाबत कायदा हा खिश्यातून चिठ्ठी काढण्याइतके सोपे नाही. कायद्यासाठी अभ्यास करावा लागतो. अनेक राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. गेल्या अधिवेशनात याबाबत विचार झाला आहे. प्राथमिक माहिती ही सादर देखील करण्यात आली आहे. कदाचित या पावसाळी अधिवेशनात देशातील सर्वात कडक आणि प्रभावशाली धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात येईल, तशी आमची तयारी असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे. पुण्यातील घोरपडी गाव येथे घडलेल्या लव्ह जिहादबाबत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. राज्यात काही लोकप्रतिनिधी सांगतात की लव्ह जिहाद होत नाही. ट्रिपल तलाक राहिला पाहिजे. हिंदूंचे धर्मांतर होत नाही. सगळ्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. जे बेजबाबदार वक्तव्य केले जात आहे. आज त्याला या घटना समोर आहे. आज राज्याचे गृहमंत्री बदलले आहेत. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिलेले नाही. यापुढे जर कोणत्याही हिंदूंना कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला दोन पायावर परत जाऊ देणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.