हिंगोली: वसमत शहर परिसरात काल सायंकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. जवळपास तासभर मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अनेक भागांमध्ये नगरपरिषदेने नाल्या व गटारी स्वच्छ न केल्यामुळे नाल्यांमधील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे. त्यामुळे नगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे नाल्या स्वच्छ करण्यासाठी अनेक भागातून नागरिकांनी मागणी देखील केली होती,आंदोलने देखील झाली होती. मात्र नगरपालिकेवर याचा काही परिणाम झाला नाही. शहरातील कॅनल परिसरात तर कॅनलचे पाणी बाहेर पडल्यामुळे पाच ते सात घरांमध्ये हे पाणी घुसले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.