नांदेड: नांदेड जिल्ह्यातील जांभळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने अवघ्या ३० गुंठे शेतात वांग्याची लागवड केली आहे. शेतात वांग्याची लागवड करून चार लाखाचे उत्पन्न काढण्याचा विक्रम, जांभळा येथील शेतकरी निरंजन सरकुंडे यांनी केला आहे. यातून त्यांनी तीन ते चार लाख रुपयाची कमाई केली आहे. निरंजन यांना ५ एकर एकर शेती आहे. यापूर्वी सरकुंडे हे आपल्या शेतात पारंपरिक पीक घेत होते. मात्र त्यांना म्हणावे तसे उत्त्पन्न मिळाले नाही. दोन बाय दोन बेड पद्धतीने या वांग्याची लागवड त्यांनी केली. पाणी कमी असल्याने, पाण्याची बचत व्हावी यासाठी ठिबकचा वापर करून त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन केले. तर दोन महिन्यात वांगे तोडणीला आले असून, जवळच्या उमरखेड आणि भोकर या बाजारात या वांग्याची विक्री केली जाते. सध्या बाजारात भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे निरंजन सरकुंडे यांना वांग्याच्या उत्पादनातून जवळपास 2 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी केवळ 30 हजारांचा खर्च आला आहे. भाजीपाला शेती परवडणारी असल्याने, सध्या जांभळा या गावातील शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळताना दिसत आहेत.