अमरावती - पावसाळ्याचे जवळपास 75 दिवस उलटून गेले. दरवर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असतो, ज्यामुळे राज्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठी वाढ होत असते. परंतु, यंदा फार समाधान कारक पाऊस न झाल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
हेही वाचा -हुकूमशाही संपविण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच पर्याय; आमदार रवी राणांचं वक्तव्य
मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अप्पर वर्धा धरणात तबल 95 टक्के जलसाठा जमा झाला होता, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्गही सोडण्यात आला होता, परंतु यावर्षी परिस्थिती वेगळी आहे, कारण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र 25 टक्के जलसाठा कमी असून या धरणात 70 टक्के जलसाठा आहे.
पश्चिम विदर्भात एकूण 9 मोठे पाणी प्रकल्प आहे. या पाणी प्रकल्पांची स्थिती अशीच आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र या धरणांतील जलसाठ्याची टक्केवारी ही कमालीची घटली आहे. दमदार पावसाचे दिवस आता उलटून गेले आहेत, त्यामुळे आता परतीच्या पावसावर या धरणाची पातळी वाढण्याची प्रतीक्षा आहे.
..या ठिकाणी होतो पाणी पुरवठा
अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहर, वरूड, वर्धा जिल्ह्यातील आष्टीसह आदी ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतही याच धरणातून पाणीसाठा पुरवला जातो. परंतु, जर जलसाठा वाढला नाही, तर मात्र चिंता निर्माण होऊ शकते.