ठाणे - अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे. या घातक वायू गळतीमुळे २८ कामगारांना बाधित झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे बाधितांमध्ये महिला कामगारांची संख्या जास्त आहे. तर आर. के. केमिकल कंपनी असे घातक वायू गळती झालेल्या कंपनीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना वायू गळती -
आर. के. केमिकल्स कंपनीमध्ये असून सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया करण्याचे सुरु होती. त्यातच कंपनीत आज सकाळच्या सुमारास डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना अचानक प्लँटमधला एक पाईप निसटला आणि त्यातून हवेत गॅस पसरला. हा गॅस थेट बाजूलाच असलेल्या प्रेस फिट नावाच्या कंपनीत शिरल्याने अचानक धूर निर्माण होऊन वायू गळती झाली, आणि कामगारांना श्वास घ्यायला त्रास सुरु झाला. त्यामुळे कंपनीतील जवळपास २२ कामगारांना उलट्या, मळमळ, गुदमरणे असा त्रास सुरू झाला.