पुणे - पिंपरी चिंचवड शहरात आर्थिक वादातून आरोपी गणेश सुभेदार पवार व त्याच्या साथीदारांनी रहाटणी येथून संतोष अंगरख याचे अपहरण केले. यानंतर त्याचा कासारसाई येथे खून करण्यात आला. ही घटना 16 ऑगस्टला घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली. मात्र आणखी एक आरोपी फरार होता. त्याला वाकड पोलिसांनी तीन महिन्यानंतर उत्तर प्रदेशातून जेरबंद केले आहे. संदीप ऊर्फ घुंगरू लालजी कुमार (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तीन महिन्यांनंतर खुनातील आरोपी जेरबंद; उत्तर प्रदेशातून केली अटक
पिंपरी चिंचवड शहरात आर्थिक वादातून आरोपी गणेश सुभेदार पवार व त्याच्या साथीदारांनी रहाटणी येथून संतोष अंगरख याचे अपहरण केले. यानंतर त्याचा कासारसाई परिसरात खून करण्यात आला. अखेर या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
अपहरण करून खून
पिंपरी-चिंचवड शहरातून संतोष अंगरख याचे अपहरण करून हिंजवडी परिसरातील कासारसाई परिसरात त्याला नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले होते. त्यानुसार वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना आदेश दिले होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी गाठले उत्तर प्रदेश
वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने आणि पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे, शाम बाबा हे फरार आरोपींचा शोध घेत होते. आरोपीबाबत माहिती घेतल्यानंतर तो उत्तर प्रदेशला पळून गेल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने व पथकातील पोलीस अंमलदार विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन गेंगजे यांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.