नाशिक - चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यातमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. ते टाळण्यासाठी नाशिक येथील कल्याणी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चाळीतील खराब कांद्याची महिती मिळणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी वापरले तर त्यांचे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ -
नाशिकला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ म्हणून ओळखले जाते. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी 40 टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो. देशासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो टन कांदा येथून निर्यात केला जातो. बाजारात भाव नसेल तर शेतकरी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो. वातावरणातील बदलांमुळे चाळीत साठवलेला 40 टक्के कांदा खराब होतो. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक फटका बसतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कुटुंबातील कल्यानी शिंदे हिने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकरून 'गोदाम इनोव्हेशन्स' हे तंत्र विकसित केले आहे.
कोण आहे कल्याणी शिंदे -
कल्याणी शिंदे ही नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. कल्याणीने कॉम्प्युटर इंजिनिअरची पदवी मिळवलेली आहे. इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना तिची निवड टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक येथील 'डिजिटल इम्पॅक्ट स्वेअर' नावाच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये झाली. याच काळात तिचे लक्ष 'कांदा' या विषयाकडे वळले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याला मोठी मागणी असूनसुद्धा शेतकरी त्रस्त का हा प्रश्न तिला पडला? याबाबत संशोधन करण्यास तिने सुरुवात केली.