महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाविरोधात लढणारे नंदुरबार जिल्ह्यातील 'त्रिमुर्ती' डॉक्टर; अनेकांना दिले जीवदान

By

Published : May 8, 2021, 4:04 PM IST

नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम जिल्हा म्हणून समजला जातो. पाहिजे त्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसताना. कोरोनाच्या संकटावर कशी मात करावी याचे सर्वात मोठे उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातील त्रिमूर्ती डॉक्टरांनी घडवले आहे.

Nandurbar
नंदुरबार

नंदुरबार -नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम जिल्हा म्हणून समजला जातो. पाहिजे त्या आरोग्य सुविधा उपलब्ध नसताना. कोरोनाच्या संकटावर कशी मात करावी याचे सर्वात मोठे उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातील त्रिमूर्ती डॉक्टरांनी घडवले आहे. 20 बेडपासून सुरु केलेला कोरोनाचा प्रवास आता चारशे बेडवर पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होण्यामागे जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टरपासून तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.

या तीन डॉक्टरांचे कोरोनाकाळात उत्तम काम

त्रिमूर्तींनी दिले अनेकांना जीवनदान

आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारची आरोग्य यंत्रना तशी जिल्हा सामान्य रुग्णालय भरवसेच आहे. अतिशय तुटपुंज्या मनुष्य बळावर रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजनाद्वारे हजारो कोरोनाबाधितांना नवे जीवदान दिले. या रुग्णालयातील तीन डॉक्टरांनी पुढाकार घेत आपल्या आरोग्य सहकाऱ्यांच्या मदतीने वीस बेडपासून सुरु केलेला प्रवास आता चारशे बेडवर पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची त्रिमुर्ती खऱ्या अर्थाने अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे.

हेही वाचा -मुंबईत दोन कुटुंबांमध्ये फ्री स्टाईल मारामारी, बायाही उतरल्या मैदानात, बघा व्हिडिओ

डॉ रघुनाथ भोये यांनी वर्षभरात घेतल्या फक्त चार दिवस रजा

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार हे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रघुनाथ भोये पाहतात. तब्बल सात वर्षांपासुन जिल्हा सामान्य रुग्णालयाची धुरा पाहणाऱ्या डॉ. रघुनाथ भोयेकडे तसे आरोग्य विभागाने बदलीसाठी लक्ष दिलेच नाही. मात्र त्याचाही फायदा नंदुरबारकरांनाच झाला. या डॉक्टरांनी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयाला नवसंजीवनी देत त्याचा चांगलाच कायापालट केला. नुसत्या कोरोना काळाचा विचार करायचा झालच तर या रुग्णालयातील कोरोना काळ सुरु झाल्यापासून वीस बेडचा प्रवास आता दोनशे ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेडवर आला आहे. शासकीय रुग्णालयात अद्यावत महिला रुग्णालय आज कोविडसाठी वापरले जात आहे. ब्लड बँक, आय हॉस्पिटल अशा किती तरी नव्या इमारती बांधण्याचे काम यांच्याच कार्यकाळात झाले. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असतांना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णलयात तो कधीच झाला नाही. इतकच काय तर ज्या ऑक्सिजन नर्स संकल्पेनेच राज्यभर कौतुक झाले ती याच डॉक्टरांच्या अभिनव संकल्पनेचा भाग आहे. नेहमीच काही तरी नवनवीन उपक्रम करुन रुग्णांना दिलासा देण्याचा डॉ. रघुनाथ भोये यांचा मानस राहीला आहे. मार्च २० पासून आजतागायत जिल्हा शल्य चिकित्सकांना फक्त दिवाळी काळात घेतलेल्या चार रजा वगळता त्यांनी पुर्ण काळ जिल्हा सामान्य रुग्णालयासाठीच झोकून घेतले आहे. त्यामुळेच त्यांच्या उत्तम नियोजनामुळेच आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविडसह सर्वच कारभार सुस्थितीत दिसून येत आहे.

कोविड रुग्णांबरोबरच इतर रुग्णांवर देखील उपचार- डॉ. सातपुते

डॉ. रघुनाथ भोयेंच्या खांद्याला खांदा लावून आणखीन एक डॉक्टर नंदुरबारच्या रुग्णसेवेसाठी सतत झटताना दिसले ते म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के.डी सातपुते. आदिवासी बहुल भागात इतर आजारांसाठी रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याच भरवश्यावर रहावे लागते. त्यामुळे कोरोना साभाळून डॉ सातपुते यांनी इतर रुग्ण उपचारांवर देखील विशेष लक्ष दिले. गरोदर माता बाळांतपण असो, वा कुपोषित बालकांचे पुनर्वसन केंद्र या गोष्टीकडे या कार्यकाळात लक्ष देवून त्यांच्यावर ऑक्सिजन नियोजनाची असलेली जबाबदारी डॉ. सातपुते यांनी लिलया पार पाडली. सोबतच रक्त पेढीतील रक्त तुटवड्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे गेल्या मार्चपासून यांनीही अवघ्या आठच सुट्ट्या घेतल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर बारकाईने लक्ष देण्याचे काम डॉक्टर सातपुते यांनी केले आहे. त्याचबरोबर दिवसभरातून ऑक्सिजन सिलेंडरची मात्रा किती आहे, याचेदेखील हिशोब स्वतः ठेवत आहेत. एकंदरीतच या जिल्हा रुग्णालयात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये तसेच कोरोना रुग्णांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचे काम डॉक्टर सातपुते यांनी केले आहे.

डॉ. राजेश वसावे यांनी स्वतःचे दुःख विसरून दिली रुग्णांना सेवा

कोरोना काळात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयाचे इनचार्ज होते ते डॉ. राजेश वसावे. आदिवासी बहुल भागातील गोरगरिब रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्याची यांची धडपड नेहमीच राहिली आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यकाळात त्यांच्या अर्धांगीनी देखील त्यांना सोडून गेल्या असताना कोरोना रुग्णांची दाहकता लक्षात घेता त्यांनी आपले दु:ख सारुन जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. डॉ राजेश वसावे यांनी वैद्यकीय उपचार केलेले आज शकडो रुग्ण घरी परतल्याने त्यांना आवर्जुन धन्यवादही देताना दिसून येतात. अर्धांगिनीच्या दुःखात असताना त्यांनी कोविड रुग्णांच्या दुःखात सहभागी होऊन आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. स्वतःवर असलेल्या दुःखाचे डोंगर बाजूला ठेवून त्यांनी इतरांची वेदना समजून घेतल्या त्यांच्या या कार्याबद्दल जिल्हा सदैव त्यांचा ऋणी राहील.

आज नंदुरबारच्या विविध योजना राज्यात गाजत आहेत. कधी कुपोषणासाठी प्रसिद्ध असलेला नंदुरबार जिल्हा आरोग्यातील विविध अभिनव योजनांसाठी आता राज्यात पथदर्शी ठरत आहे. हे सारे करताना या त्रिमुर्ती डॉक्टरांच्या हात बळकटीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अन्य शेकडो हातांची अमुल्य मदतच असल्याचे हे तिघेही आवर्जुन सांगतात. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने न दमता न थकता कोरोना काळात दाखवलेली ऊर्जा खऱ्या अर्थाने आरोग्य यंत्रणेला आलेली मरगळ झटकण्यास कारगीर ठरेल. नेतृत्व उत्तम राहील्यास काय सकारात्मक बदल घडतो याचीच प्रचिती या तिन्ही त्रिमुर्ती डॉक्टरांनी घडवून दिली आहे. या त्रिमूर्ती डॉक्टरांनी अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे. कोणाच्या अत्यंत वाईट परिस्थितीच्या काळात हे तीनही डॉक्टर खंबीरपणे उभे राहून रुग्णांवर उपचार करीत रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देखील देत होते.

हेही वाचा -सोलापूरमधील माळशिरस पंढरपूर, करमाळा ठरतोय कोरोना हॉटस्पॉट

ABOUT THE AUTHOR

...view details