महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबार जिल्ह्यातील 'या' चार शहरांमध्ये पुन्हा 'लॉकडाऊन'

By

Published : Jul 22, 2020, 4:50 PM IST

जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याणे 22 जुलैच्या मध्यरात्री पासून 30 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे.

FILE PHOTO
FILE PHOTO

नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानेही हॉटस्पॉट बनणार्‍या नंदुरबार जिल्ह्यातील चार शहरांमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार शहरात दि. 22 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजण्यापासून ते 30 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. याकाळात अत्यावश्यक सेवांना सुट देण्यात आली आहे. पेट्रोलपंपावरही अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र पाहिल्यानंतरच पेट्रोल दिले जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या बाधितांचा आकडा 414 वर पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर ही शहरे कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या शहरांमध्ये टाळेबंदी जाहिर केली आहे. या काळात दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती राहील. वैद्यकीय सेवा आणि औषध विक्रीच्या आस्थापना पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील तर सर्व प्रकारची दुकाने, सर्व खासगी आस्थापना बंद राहील.

या चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा असेल. मात्र, त्यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे. या शहरांमधील सरकारी कार्यालये मर्यादीत उपस्थितीत सुरू राहतील. तथापि अभ्यागतांना कार्यालयास भेट देण्यास परवानगी नसेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी वरील कालावधीत धान्य वाटप न झालेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटपाची सेवा पुरवावी. पेट्रोलपंपावर कोरोनाविषयी कामकाज करणाऱ्या शासकीय ओळखपत्रधारक अधिकारी-कर्मचाऱ्यांना तसेच शासकीय वाहनांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे. या व्यतिरिक्त अन्य वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये. असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

या कालावधीत अक्कलकुवा व अक्राणी शहरातील सर्व आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. 30 जुलैपर्रंत वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासास पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांनी 22 जुलै रोजी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार करावा. संसर्ग रोखण्यासाठी विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शारिरीक अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत टाळेबंदीचे पालन करावे. या कालावधीत अनावश्यकपणे बाहेर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आधीच करावी. वस्तू खरेदी करतांना गर्दी करू नये व टाळेबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details