महाराष्ट्र

maharashtra

समीर वानखेडे यांना 28 जून पर्यंत कारवाईपासून संरक्षण, शाहरुख खानला पक्षकार बनवण्याची मागणी

By

Published : Jun 23, 2023, 5:46 PM IST

एनसीबी तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले. तसेच शाहरुख खान याला देखील पक्षकार बनवावे अशी मागणी करण्यात आली. आज सुनावणी दरम्यान एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अटक करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. शाहरुख खान यालादेखील आरोपी करण्यात यावे याची पुन्हा आज मागणी झाली.

समीर वानखेडे
समीर वानखेडे

मुंबई - आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे आणि त्या माध्यमातून बेहिशोबी मालमत्ता जमा केली असा एफआयआर सीबीआयने दाखल केलेला आहे. त्या अंतर्गत सीबीआयकडे चौकशी सुरू आहे. परंतु न्यायालयामध्ये आज झालेल्या सुनावणीत समीर वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण न्यायालयाने दिले आहे. तर 'शाहरुख खान याला मोकळे का सोडता. त्यांना देखील आरोपी करण्यात यावे' अशी देखील याचिका या प्रकरणात जोडून घ्यावी,अशी मागणी वाकिल निलेश ओझांकडून करण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

समीर वानखेडे यांनी चौकशीत सहकार्य केल्याचा दावा - समीर वानखेडे यांच्या वतीने आबाद फोंडा यांनी मुद्दा उपस्थित केला की "समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या चौकशीसाठी सलग सात दिवस हजेरी त्यांच्या कार्यालयात लावलेली आहे. परंतु सध्या तरी त्यांच्याकडून चौकशीसाठी कोणतेही बोलावणे आले नाही." यासंदर्भात खंडपीठाने उपस्थित सीबीआयचे वकील कुलदीप पाटील वकिलांना विचारले की "चौकशी झाल्यासंदर्भातील केस डायरी कुठे आहे? सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी सांगितले की," आता तरी आमच्यासोबत ती डायरी नाही. सोमवारी ती न्यायालयात आम्ही देऊ".

सीबीआयच्या वकिलांचे धक्कादायक वक्तव्य - सीबीआयचे वकील कुलदीप पाटील यांनी आज न्यायालयामध्ये धक्कादायक विधान केले. त्यांनी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना म्हटलं की "एनसीबीचा (NCB) एसईटी (SET) म्हणजेच विशेष तपास पथकाचा अहवाल आहे; तो फॅब्रिकेटेड आहे." त्यावर न्यायालयाच्या खंडपीठाने असे विचारले "की तुम्ही केंद्रीय गुन्हे अन्वेषणवर आक्षेप घेताय?" त्यावर कुलदीप पाटील यांनी सांगितले की, "सीबीआयकडून डोळेझाकून या केसबाबत पावले उचलली गेली." त्यानंतर पुन्हा खंडपीठाने कुलदीप पाटील यांना विचारलं की,"तुम्ही सीबीआयचे वकील आहात की फिर्यादीचे ते स्पष्ट करा." खंडपीठाच्या या निरीक्षणानंतर न्यायालयात एकदम शांतता पसरली.


शाहरुख खान यांना पक्षकार बनवावे - यासंदर्भात वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणांमध्ये "शाहरुख खान याला मोकळे का सोडले जात आहे असा प्रश्न केला. तशी त्यांची याचिका देखील दाखल झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी मागितली. त्यांनी सांगितले की "जनहित याचिका राशीद खान पठाण यांनी याबाबत दाखल केलेली आहे. आणि या खटल्यामध्ये लाचखोरीचे जर प्रकरण आहे. तर शाहरुख खान आणि आर्यन खान यांना देखील पक्षकार म्हणून बनवले जावे. आमचे म्हणणे आहे की 'आर्यन खानला खटल्यामधून दोषमुक्त करावे यासाठीच एनसीबीचा आणि सीबीआयचा हा खटला रचण्यात आला होता."

सीबीआयने केले आरोपाचे खंडन -यासंदर्भात समीर वानखेडे यांच्याकडून वकिलांनी बाजू मांडली की सीबीआयने हा तपासाचा बनाव केला. यासंदर्भात सीबीआयचे वतीने वकील कुलदीप पाटील यांनी दावा केला की "हा तपासाचा बेबनाव कसा असू शकतो. प्राथमिक टप्प्यामध्ये आरोपी कोण आहे. कोणाला आरोपी करायचे वस्तुनिष्ठ रीतीने घटना काय घडली हे प्रथमदर्शनी पुरावे ज्या पद्धतीने समोर येतात. त्यापद्धतीने कोणाला आरोपी करायचे ते सीबीआय ठरवेल. तो सीबीआयचा अधिकार आहे, चौकशी त्यासंदर्भात सुरू आहे. चौकशीअंती अनेक गोष्टी तोच रीतीने समोर येतील."


सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने 28 जूनपर्यंत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना संरक्षण दिले. तर "समीर वानखेडे चौकशीत सहकार्य करत नाही म्हणून अटक मिळावी "अशी मागणी त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली. परंतु समीर वानखेडे यांचे वकील आबाद फोंडा यांनी या युक्तीवादाचे जोरदार खंडन केले. तर सीबीआयचा युक्तिवाद खंडपीठाने अमान्य करत समीर वानखेडे यांना 28 जूनपर्यंत अंतिमतः संरक्षण देण्याचे निर्देश दिले.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details