महाराष्ट्र

maharashtra

Jayant Patil On Manipur Violence : सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय, केंद्र सरकार मात्र निष्क्रिय - जयंत पाटील

By

Published : Jul 25, 2023, 5:15 PM IST

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचाराविरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांकडून मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले.

Jayant Patil On Manipur Violence
जयंत पाटील

मणिपूर हिंसाचारावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई :आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे, हे मणिपूर येथील घडणाऱ्या हिंसाचारातून लक्षात येते. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. तिथे राज्यातील सरकारही भाजपचे आहे आणि केंद्रातील सरकारही भाजपचेच; मात्र हा हिंसाचार थांबवण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. मणिपूर येथील हिंसाचारावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अतिशय किळसवाणा प्रकार महिलांसोबत घडत आहे. तिथल्या सामान्य माणसाला अत्यंत असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे मणिपूर आणि केंद्र सरकार विरोधातील देशातील लोकांच्या भावना संतप्त आहेत.


हिंसाचारावर चर्चेची मागणी केल्याने निलंबन :केंद्र सरकारने लष्कराला पाचारण करून मणिपूर शांत करायला पाहिजे. मात्र दोन महिन्यांपासून धगधगत्या मणिपूरकडे सरकार कोणतेही लक्ष देत नाही. सरकारच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज राज्यभरात आंदोलने केली आहेत. सरकार म्हणतंय की, विरोधक मणिपूरवर संसदेत चर्चेला तयार नाही; मात्र आपचे खासदार संजय सिंह यांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी केली तेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले. विरोधी पक्ष मणिपूरवर चर्चेची मागणी करतोय; मात्र त्यांना बोलू दिले जात नाही. ही गोष्ट धक्कादायक आणि दुर्दैवी आहे, असा रोष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राकॉं तो प्रश्न लावून धरणार :महाराष्ट्रातही महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे असे म्हणत, आम्ही हा विषय विविध संसदिय आयुधांमार्फत सभागृहात उपस्थित करत आहोत; मात्र सरकारमार्फत यात चालढकल केली जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केला. मानव तस्करीचे रॅकेट महिला व मुलींना आखाती देशात घेऊन जातात, त्यांच्याकडून चुकीचे कामे करून घेतात. यात अनेक रॅकेट कार्यरत आहेत. त्यांच्यावर एफआयआर दाखल झाले आहेत; मात्र त्यासंदर्भात शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. बेपत्ता महिला व मुलींपैकी काही महिला व मुली मदत मागत असतात; मात्र सरकारकडे त्याबाबत यंत्रणा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रश्न विविध माध्यमातून लावून धरणार आहे, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

हेही वाचा:

  1. Maharashtra Onion To Manipur : मनमाडचा कांदा पोहचला हिंसाचारग्रस्त मणिपूरला
  2. NCP Women Front Protest: मणिपूरच्या घटनेवर चित्रा वाघ गप्प का? राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा सवाल
  3. Nana Patole Reaction : देशातील भाजपाला आली आहे सत्तेची मस्ती, नाना पटोले यांचा घणाघात

ABOUT THE AUTHOR

...view details