महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Weather Update : ऐन थंडीत 'ऑक्टोबर हिट'चे चटके; मुंबईसह राज्यात उकाडा वाढला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 6:48 PM IST

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. त्यामुळं राज्यात आतापासूनच कडक उन्हाळा नागरिक सहन करताना दिसतायेत. तर अरबी महासागरात (Arabian Sea) कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम वातावरणात दिसतोय. यामुळं तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये कमाल तापमान नोंदले गेल्यामुळं उकाड्यानं मुंबईकर हैराण (Mumbai October Heat) झाले आहेत.

Mumbai October Heat
ऑक्टोबर हिटचा चटका

मुंबई : Maharashtra Weather Update : सध्या मान्सून परतला असून, राज्यातील बऱ्याच भागातून पावसानं विश्रांती घेतली आहे. एकीकडं पहाटे थोडीफार थंडी आणि धुके आहे, तर दुसरीकडं ऑक्टोबर हिटचा चटका (Mumbai October Heat) जाणवत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात वातावरणातील पारा वाढला आहे. कमालीची गरमी आणि उकाडा जाणवत आहे. काही दिवसांपासून राज्यात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक वाढले आहे. यामुळं अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच आरोग्याची खबरदारी म्हणून जास्तीत जास्त ताक, लिंबू पाणी किंवा थंड पेय पिण्याचा सल्ला देखील आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र निर्माण : दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिटची दाहकता महाराष्ट्रात अधिक आहे. अरबी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम वातावरणात दिसत आहे, असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी सांगितलं आहे. तसेच पुढील काही दिवस म्हणजे २६ ऑक्टोबरपर्यंत किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणजे उष्माघात (Heat Stroke) वाढण्याची आणि पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तापमान वाढीस कारण काय? : मागील काही महिन्यांपासून वातावरणात कमालीचा बदल दिसत आहे. कधी प्रचंड गरमी तर कधी थंडी असं वातावरणात बदल जाणवत आहेत. हिवाळ्यात गरमी आणि उन्हाळ्यात पाऊस असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. वातावरण बदल आणि हवामान बदल याला कारण म्हणजे कॉबर्नडाय ऑक्साईडची पातळी वाढणे आहे. तसेच मिथेनची देखील पातळी वाढतेय, यामुळं वातावणात उष्माघात व तापमानाचा पारा वाढतोय. दरम्यान, प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, तेव्हा देखील तापमानात वाढ होते. समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान हे २७ ते २८ अंश सेल्सिअस असते. मात्र, ते सध्या ३ अंशाने अधिक आहे. याचा परिमाण वातावरणावर होतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details