महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Politics : राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी फिल्डींग, नेतृत्वाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी

By

Published : May 24, 2023, 8:28 PM IST

Updated : May 24, 2023, 10:12 PM IST

Maharashtra Politics

सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारा बरोबरच राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागांचा मुद्दा चर्चेत आला आहे. इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डींग लावली असून दिवसेंदिवस कार्यालय, निवासस्थानी भाऊ गर्दी करायला सुरुवात केली आहे. मात्र, प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने रिक्त जागांचा तिढा कायम आहे. न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर तात्काळ या जागा भरल्या जाणार आहेत.

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सत्तासंघर्षाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात होता. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल ही प्रलंबित होता. तब्बल नऊ महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिंदे गटाचे प्रवक्ते, मुख्यमंत्री शिंदे यांचे गटनेते पद रद्द ठरवत जोरदार ताशेरे ओढले. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. अपात्रतेच्या कारवाई विहित काळावधी लागणार आहे. सरकार स्थिर झाल्याचे सांगत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याची घोषणा केली.

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी इच्छुक उमेदवार

लॉबिंग, फिल्डिंग, भाऊगर्दी :एकीकडे विस्ताराची चाचपणी सुरु झाली असताना, दुसरीकडे राज्यपाल नियुक्त 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, अशी चर्चा सुरु आहे. परंतु, हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात गेले आहे. न्यायालयाने यावर नुकतीच सुनावणी घेतली. मात्र या प्रकरणावर अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने मात्र 12 जागांसाठी राज्यपालांकडे नावे पाठवली आहेत, असे सांगण्यात येत आहे. भाजप, शिंदे गटाने या जागांसाठी जोरदार लॅाबिंग सुरू केली आहे. इच्छुकांनी तर पक्ष नेतृत्वाकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. मंत्रालय, पक्ष कार्यालयात देखील अनेकांची गर्दी वाढू लागली आहे.

जागांचे वाटप, चर्चेतील नावे : राज्यात शिवसेना शिंदे गटाचे 44, भाजपचे 106 आमदार आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार राज्यपाल नियुक्त 12 जागांचे वाटप केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने 8 तर, शिंदे गटाला 4 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून 5 जागांवर दावा केला जातो आहे. भाजपचा मात्र, त्याला विरोध आहे. परंतु, शिंगे गटाकडून या 12 जागांसाठी माजी मंत्री रामदास कदम, विजय शिवतारे, नरेश म्हस्के, संजय मोरे, शितल म्हात्रे यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या लोकांना संधी देण्याची तयारी केली आहे. तसेच विधान परिषदेचा कालावधी संपलेल्या आमदारांचा यात पुन्हा समावेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. यात चित्रा वाघ, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंह,माधव भंडारी, चैनसुख संचेती, प्रकाश मेहता यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल नियुक्त 12 जागांचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. निर्णय आल्यावर रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकारने 12 जागांसाठी नावे निश्चित केली आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल - शितल म्हात्रे, शिंदे गटाच्या प्रवक्त्या

महाविकास आघाडी आणि राज्यपाल वाद :महाविकास आघाडी सरकार असताना, राज्यपाल नियुक्त रिक्त 12 जागांचा प्रस्ताव तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अडवून ठेवला होता. मध्यंतरी 12 नावे गहाळ देखील केल्याची बाब समोर आली होती. प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायाधीशांनी यावरुन खरडपट्टी काढली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोश्यारीमध्ये अनेकदा यावरुन जुंपली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा भेटीगाठी घेतल्या. मात्र राज्यपालांनी अखेरपर्यंत हा मुद्दा हातळला नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

लवकरच शिक्कामोर्तब करु :राज्यपाल नियुक्त 12 जागांचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. निर्णय आल्यावर रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकारने 12 जागांसाठी नावे निश्चित केली आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray : राज्यात निवडणूक होणारच नाही; असे का म्हणाले उद्धव ठाकरे? घ्या जाणून...
  2. Manohar Joshi Health : मनोहर जोशी यांची प्रकृती चिंताजनक, ICU मध्ये उपचार सुरु
  3. Sengol : नव्या संसदेत बसवण्यात येणारा 'सेंगोल' म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या
Last Updated :May 24, 2023, 10:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details