मुंबई : याचा फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होत असल्याने या शाळांकडे मुंबईकरांचा ओढा वाढला आहे. या शाळांमध्ये ज्युनियर केजी मधील ऍडमिशन सुरु झाली असून, गरजू पालकांनी अर्ज करून आपल्या पाल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण द्यावे असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा एकेकाळी घसरला होता. यामुळे पालकांनी आपल्या मुलांना इंगर्जी माध्यमांच्या शाळेत टाकण्यास सुरुवात केली. यामुळे पालिका शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले होते. यावर उपाय म्हणून पालिकेने आपल्या विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या.
दर्जेदार, डिजिटल शिक्षण : विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणीक साहित्य, युनिफॉर्म, टॅब आदी मोफत देण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून दहावी परिक्षेपूर्वी परिक्षा घेण्यास सुरुवात केली. यामधून विद्यार्थ्यांना परिक्षेला तयार केले गेले. याचा फायदा म्हणून पालिकेच्या शाळांचा दहावीचा रिझल्ट वाढतच राहिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत. सर्व पालिका शाळांना एकाच प्रकारचा रंग दिला जात आहे. शाळांवरील नावाचे फलक आकर्षित बनवले जात आहेत. वर्गात चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडेल असे वातावरण निर्माण केले जात आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम द्वारे शिक्षण दिले जाते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण : दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल केल्या जात आहेत अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या आहेत. तसेच, सी.बी.एस.ई. बोर्डच्या ११, आय.सी.एस.ई. बोर्डची १ शाळा सुरु केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आय. बी. बोर्डची शाळा सुरू करण्यात आली आहे.