महाराष्ट्र

maharashtra

लातूर : 'त्या' अपहरणकर्त्यांना अखेर दोन महिन्यांनी अटक

By

Published : Nov 27, 2020, 7:20 PM IST

रेणापूर तालुक्यातील सांगवी येथून 5 वर्षीय रियांशचे अपहरण झाले होते. हा परिसर त्याच्यासाठी नवीन असला, तरी लहान-सहान बाबी त्याने लक्षात ठेवल्या आणि तपासादरम्यान पोलिसांना सांगितल्या. यावरून घटनेनंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

four-accused-in-five-year-old-boy-kidnapped-case-arreste-after-two-months-in-latur
'त्या' अपहरणातील आरोपींना अखेर दोन महिन्यांनी अटक

लातूर -दोन महिन्यांपूर्वी रेणापूर येथील सांगवी येथून एका 5 वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. यानंतर दोन दिवसांमध्ये हा मुलगा मुरुडजवळील चाटा येथे आढळला. परंतु, यामागे कोण होते, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दोन महिन्यांनी या घटनेतील चार आरोपींना बेड्या ठोकण्यात आली आहे. यामध्ये अपहरण झालेल्या रियांश याची हुशारी आणि पोलिसांचे अथक परिश्रम कामी आले आहेत.

हिम्मत जाधव यांची प्रतिक्रिया

असे झाले अपहरण -

देवीदास विठ्ठल सावंत (69) हे मूळचे रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील आहेत. परंतु गेल्या 40 वर्षांपासून व्यवसायाच्या निमित्ताने ते ठाणे येथे वास्तव्यास आहेत. शेतीवाडीच्या निमित्ताने ते गावाकडे येत असतात. 1 नोव्हेंबर रोजी देवीदास यांची पत्नी मधुमती या आपल्या दोन नातवांना घेऊन सांगवी या मूळ गावी आल्या होत्या. 11 नोव्हेंबर रोजी देवेश (7) आणि रियांश (5) हे दोन नातू गल्लीतील मुलांसोबत खेळत होती. मात्र, एका गाडीतून आलेल्या तिघांनी रियांशचे अपहरण केले. रात्री उशिरापर्यंत 5 वर्षांचा रियांश घरी परतला नसल्याने आजोबा देवीदास सावंत यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. रियांशसाठी सांगवी हा परिसर नवीनच होता. शिवाय देविदास यांचे हे मूळ गाव असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गावातील सर्वांनाच माहिती होती. त्याकरिता पैशासाठी अपहरण केली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. परंतु, दोनच दिवसांनी मुरुड जवळील चाटा येथे रियांश पोलिसांना आढळला. गावापासून 20 ते 25 किमी असलेल्या गावी रियांश आलाच कसा याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी कामाला लागले. यामध्ये गुप्तहेरांकडून मिळालेली माहिती आणि 5 वर्षीय रियांश याचा हुशारकीपणा पोलिसांच्या कामी आला.

मुलाच्या मदतीन अपहरणनाट्याची उकल

अपहरण केल्यानंतर ज्या ठिकाणी रियांशला ठेवण्यात आले होते. ती झोपडी एका आरोपीच्या आजीची होती. त्या ठिकाणचे वर्णन रियांशने पोलिसांनी सांगितले. केवळ वर्णनावरून घटनास्थळी जाणे तसे अवघड होते. पण स्थानिक गुन्हे शाखेने चाटा परिसरातील तब्बल दोनशेहून अधिक झोपड्या पालथ्या घातल्या आणि आरोपी किरण लक्ष्मण मुदाळे याच्या आजीची ती झोपडी असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून घटनेमागचे सत्य समोर आले आहे. या घटनेतील 4 आरोपींपैकी 3 हे औसा तालुक्यातील काळमाथा, तर एक आरोपी हा ज्या गावातून रियांशचे अपहरण झाले त्या सांगावीचा आहे. त्यानुसार किरण लक्ष्मण मुदाळे (26), मारोती लक्ष्मण मुदाळे (28), दीपक राम मुदाळे (23) रा. काळमाथा ता औसा येथील आहेत. तर गजानन लक्ष्मण सावंत हा सांगवी गावचाच आहे. शिवाय त्यास फिर्यादी देविदास सावंत यांची आर्थिक स्थिती माहिती होती. यावरूनच त्याच्या मदतीने रियांश याचे अपहरण करण्यात आले होते. याकरिता 50 लाखांची मागणी करण्यात येणार होती. परंतु, घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून पोलीस शोधकार्य करीत होते. पोलिसांच्या बारीक-सारीक हालचाली सांगवी येथील आरोपी गजानन हा सांगत होता. दोन महिन्यानंतर या घटनेतील चारही आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.

गावातील लक्ष्मण सावंत सर्व हालचालीवर होते लक्ष -

फिर्यादी देविदास सावंत यांच्या आर्थिक स्थितीची माहिती गावातील लक्ष्मण सावंत यास होती. शिवाय सर्व घडामोडीवर तो लक्ष ठेऊन होता. प्रत्यक्ष अपहरण करताना त्याची भूमिका नसली तरी इतर घडामोडीवर त्याचे लक्ष होते. परंतु, गुन्ह्याचा उलगडा झाला आणि चारही आरोपी जेरबंद झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details