लातूर - देवणी तालुक्यातील वलांडी शेतशिवारात एका पिकअप ड्रायव्हरचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बालाजी शेषराव बनसोडे पाटील, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा -राष्ट्रीय तपास यंत्रणेने लातूरमधून दोघांना घेतले ताब्यात, कारण अद्याप गुलदस्त्यात
यासंदर्भात देवणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजी शेषराव बनसोडे पाटील हे मुळचे मौजे बिहारीपूर (ता. मुखेड जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत. पण, सध्या ते उदगीर शहरातील बिदर रोड परिसरात राहत होते. मागील 6-7 वर्षांपासून त्यांनी 'उदयगीरी मल्टी सर्व्हिसेस' नावाने आपला गाड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. बनसोडे हे 15 जून रोजी उदगीरहून निलंग्याला गेले होते. निलंग्यातील काम संपवून ते उदगीरकडे निघाले होते. रात्री 7-8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला भाऊ राजेश बनसोडे यास फोन करून उदगीरकडे येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंदच होता. सकाळी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ उमाटे यांच्या शेतशिवारात बालाजी शेषराव बनसोडे पाटील यांचा मृतदेह आढळला.