महाराष्ट्र

maharashtra

अमित देशमुख, संजय बनसोडेंचे उदगीरमध्ये शक्तीप्रदर्शन; कोरोना वाढण्याची नागरिकांना भीती

By

Published : Sep 12, 2021, 8:49 AM IST

Amit Deshmukh

कोरोनामुळे गर्दी करण्यास मनाई आहे. मात्र, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे या दोन्ही मंत्र्यांनी उदगीर शहरात एकत्रित शक्तीप्रदर्शन केले. यामुळे आता नागरिकांमधून कोरोना प्रसाराची भीती व्यक्त केली जात आहे.

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे या दोन्ही मंत्र्यांनी आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उदगीर शहरात एकत्रित शक्तीप्रदर्शन केले. हे शक्तीप्रदर्शन आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, यावेळी झालेल्या गर्दीमुळे आता नागरिकांमधून कोरोना प्रसाराची भीती व्यक्त केली जात आहे.

अमित देशमुख, संजय बनसोडेंचे उदगीरमध्ये शक्तीप्रदर्शन

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख हे बऱ्याच दिवसानंतर उदगीर शहरात विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी उदगीर शहराला सजवण्यात आलं होतं. शिवाय शहराच्या मुख्य रस्त्यावर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. यावेळी नेत्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. जेसीबीला अवाढव्य फुलांचा हार लावण्यात आला होता. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावर हजर होते. ढोल-ताशांच्या गजरामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उदगीरचे विद्यमान आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय स्टंटबाजीवरून नागरिक नाराज

गणपती उत्सव सुरु झाला आहे. प्रशासनाकडून कोरोनाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय नागरिकांवर अनेक निर्बंधही घालण्यात आले आहेत. परंतु उदगीर शहरात केलेल्या या राजकीय स्टंटबाजीला कोणतीही आडकाठी नसल्याने गणेश भक्तांसह नागरिकातून मोठ्या प्रमाणात या नेत्यांवर नाराजी व्यक्त होत आहे.

नागरिकांना कोरोना पसरण्याची भीती

कोरोनाच्या नियमांचे पालन करा असं शासन व प्रशानाकडून सांगण्यात येत आहे. परंतु राज्याच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार कॅबिनेट मंत्री उदगीर दौऱ्यावर असताना शक्ती प्रदर्शन झाले. लोकांची गर्दी झाली. आगामी काही महिन्यात उदगीर नगरपरिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे आपली ताकत किती आहे? हे दर्शवण्यासाठीच शक्तिप्रदर्शन केले असल्याचे नागरिक बोलत आहेत. तर, या झालेल्या गर्दीमुळे कोरोना आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात नाही.

राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात पालकमंत्र्याचे शक्तीप्रदर्शन

सरकार कोणत्याही पक्षाचे असो प्रत्येक जिल्ह्यात एक मंत्री असा सर्वसाधारण नियम असतो. परंतु राज्यात सध्या त्रिशंकू सरकार आहे. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर लातूर जिल्ह्याला एकाच वेळी दोन मंत्री लाभले आहेत. विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तर राज्यमंत्री संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करतात. महाविकास आघाडी सरकारने लातूर जिल्ह्याला दोन मंत्री दिले आहेत. प्रत्येक पक्षाकडू जिल्ह्यात आपली ताकत वाढावी यासाठी प्रयत्न सुरु असतात. विद्यमान राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदार संघातून पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांच्या पक्षानेही त्यांना पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री केले आहे. त्यामुळे साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून जिल्ह्यातील या दोन मंत्र्यांनी आपापल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. एकमेकांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करायची नाही, असा अलिखीत नियमच पाळला जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

पण, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मतदार संघात बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे आगमन झाले. त्यातच आगामी काही महिन्यात उदगीर नगरपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. राज्यातील कॉंग्रेस नेतृत्वाने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने साहजिकच कोणाची ताकद किती? हे दाखवण्याच्या प्रयत्नात नेत्यांनी कोरोनाचे निर्बंध अक्षरश: पायदळी तुडवले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गणेश भक्तांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -Gauri Festival : 'अशी' आहे गौरी सणाची परंपरा; पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details