जालना :तहसिलदार मॅडम, मला शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. माझ्या शेताच्या आजूबाजूचे शेतकरी मला त्यांच्या शेतातून जाऊ देत नाही. त्यामुळे मला माझी जमीन कसता येत नाही. या जमिनीत पेरणी करता येत नाही. ही जमीन पडीक राहण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे माझी जमीन मला कसता यावी, म्हणून माझ्या शेतात जाण्यासाठी मला रस्ता उपलब्ध करून द्या, किंवा रस्ता देता येत नसेल तर हेलिकॉप्टर घेऊन द्या" अशी लेखी मागणी जालन्यातील एका शेतकऱ्याने जाफ्राबादच्या तहसीलदारांकडे केली आहे. आज तहसिलदार, उपविभागीय कार्यालयात गेल्या असल्याने संबंधित शेतकऱ्याला सुनावणीची पुढची तारीख मिळाली नाही. लवकरच या शेतकऱ्याची सुनवणी होणार आहे. शेतकऱ्याच्या मागणीवर तहसिलदार काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंत्रणा लागली कामाला : शेतकऱ्याच्या या मागणीमुळे संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे. सुनील भोपळे या शेतकऱ्याने केलेल्या मागणीमुळे तहसिलदार देखील चक्रावून गेल्या आहेत. तसेच शेतकऱ्याने त्याचे निवेदन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दिल्याने यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देलेल्या आदेशामुळे तलाठी, मंडळाधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करत अहवाल तहसिलदारांकडे सादर केला आहे. मात्र, अद्याप यावर निर्णय होवू शकला नाही.