गोंदिया -भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाबाबतचा अहवाल आला आणखी काही चौकशी झाल्यानंतर योग्य तो निर्णय शासन घेईल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
भंडारा जळीतकांड : न्यायवैद्यक अहवाल आला असून दोषींबाबत लवकरच निर्णय - गृहमंत्री
भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, न्यायवैद्यक अहवाल तसेच नागरिकांशी बातचित केल्यानंतर दोषींची संख्या आणखी वाढली असून दोषींबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
9 जानेवारीला भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा चिमुरड्यांचा जीव गेला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांसह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच बालरोग तज्ज्ञ असलेल्या एका डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत ही कारवाईची घोषणा केली होती.
त्याचबरोबर न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतर घटनेप्रकरणी आणखी काही दोषींची नावे पुढे आली आहे. तसेच त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्याही काही प्रतिक्रिया जाणून घेणार असून घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल व दोषींबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले.