महाराष्ट्र

maharashtra

सर्व्हेक्षण होत राहील आधी पूरग्रस्तांना आर्थिक मदत द्या - फडणवीस

By

Published : Sep 3, 2020, 7:24 PM IST

नुकत्याच झालेल्या गोसेखुर्द धरणाच्या विसर्गाने पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला. त्यामुळे या पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

गडचिरोली- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी आणि आमगाव या गावांना भेट देत त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य शासनाचे विदर्भाकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होत राहतील, आधी पूरग्रस्तांना मदत द्या, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.

प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस

नुकत्याच झालेल्या गोसेखुर्द धरणाच्या विसर्गाने पूर्व विदर्भातील ५ जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला. त्यामुळे या पाचही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी सावंगी-आमगाव ही गावे वसलेली आहेत. या दोन्ही गावांना पुराचा फटका बसला आहे. या पूरग्रस्त गावांमधील सद्यस्थितीचा फडणवीस यांनी आढावा घेतला.

दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्तांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पूरग्रस्तांची विविध निवेदने स्वीकारत फडणवीस यांनी राज्य शासनावर टीका केली. मोठे संकट असताना तत्काळ प्रतिसाद हवा होता. मात्र, प्रशासन सतर्क न झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे फडणवीस म्हणाले. पूरग्रस्तांना तातडीने रोखीने मदत करा. पंचनामे होण्याआधी अशा पद्धतीने रोखीची मदत करता येते, याकडे लक्ष वेधताना त्यांनी प्रशासनाने संथगती दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

अनेक गावांमध्ये शेती नष्ट झाली असून घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे, कोल्हापूरच्या पुराच्या वेळेस काढण्यात आलेले ६ विशेष जीआर या ५ जिल्ह्यांसाठी लागू करण्याची मागणी त्यांनी केली. कोल्हापूर पुराच्या वेळेस विद्यमान मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते व त्यांनी २५ ते ५० हजार हेक्‍टरी मदतीची मागणी केली होती. आता त्यांची सत्ता असून त्यांनी ही मागणी पूर्ण करा, असे ते म्हणाले.

राज्य सरकार विदर्भाकडे दुर्लक्ष करत असल्याचेही फडणवीस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात नसले तरी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे लक्षात आणून दिल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया उत्तमच आहे. मात्र, संकट समयी थेट लोकांमध्ये जावे लागेल, तेव्हाच उत्तरदायित्व कळते, असा टोला फडणवीस यांनी लगावला. थेट लोकांमध्ये नसल्यानेच प्रत्यक्ष स्थिती आणि अनाकलनीय निर्णय अशी स्थिती झाल्याचे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा-पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पूरग्रस्त भामरागडची पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details