चंद्रपूर - राज्यात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या दोन्ही पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार या वर्षी जिल्ह्यात तब्बल 4 लाख 71 हजार हेक्टर खरिप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांपासून कापशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव जाणवत आहे. भाव मिळत असला तरी गुलाब बोंडअळीचे संकट आहे. त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनकडे वळण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. जिल्ह्यात 4 लाख 71 हजार 761 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात येणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बी, बियाणे, खते, किटकनाशके आणि पैशाची जुळवाजुळव करीत आहेत.
जिल्ह्यात प्रामुख्याने धान, सोयाबीन आणि कापसाची लागवड करण्यात येते. सोबत तूर, ज्वारी आणि अन्य पिकांचाही समावेश आहे. जिल्ह्यात धानाचे क्षेत्र 1 लाख 84 हजार 290 हेक्टर क्षेत्र आहे. यात आणखी काही हेक्टरवर वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे.