महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh on Vajramuth Sabha : वज्रमूठ सभेचा प्रतिसाद बघून ही सभा होऊ नये यासाठी आखले जात आहे षडयंत्र - अनिल देशमुख

By

Published : Apr 13, 2023, 8:41 AM IST

महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला सामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच आता वज्रमुठ सभा होऊ नये, यासाठी अनेक षडयंत्र आखले जात आहे असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी चंद्रपुर येथील पत्रकार परिषदेत केले.

NCP leader Anil Deshmukh criticized opposition
अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी

प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी

चंद्रपूर :महाविकास आघाडी राज्यभरात वज्रमुठ सभेचे आयोजन करत आहे. 16 एप्रिल रोजी नागपूर येथे ही वज्रमुठ सभा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच किरकोळ कारणे देऊन येथे सभा घेण्यात येऊ नये, असे प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र ही सभा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. वज्रमुठ सभेच्या आयोजनाकरिता आयोजित कार्यक्रमासाठी ते चंद्रपुरात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.


शिंदे सरकारच्या काळात धार्मिक तेढ वाढली :शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यात धार्मिक उन्माद वाढला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला असताना मुख्यमंत्र्यासह राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ अयोध्येला गेले. अयोध्येला जायला विरोध नाही, परंतु शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचे नाही. आता तरी शेतकऱ्यांना ठोस मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.



राज्यात एकूण सहा सभा होणार :पक्षाचा आढावा घेण्यासाठी देशमुख बुधवारी चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. १६ एप्रिल रोजी नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. महाविकास आघाडीच्या राज्यात एकूण सहा सभा होणार आहेत. नागपूर आणि कोल्हापूर या दोन ठिकाणच्या सभेची काँग्रेस पक्षाकडे जबाबदारी आहे. पुणे व नाशिकची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. संभाजीनगर आणि मुंबई या दोन सभांची जबाबदारी उद्धव ठाकरे शिवसेनाकडे आहे. संभाजीनगर येथील प्रचंड सभा बघून भाजप नागपुरातील सभेला विरोध करीत आहे. मात्र नागपुरातील सभामैदानाचे शुल्क भरून स्थळ निश्चित केले आहे.

वाद किंवा संभ्रमाचे वातावरण नाही :भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उगीच वाद निर्माण करीत आहे, असेही देशमुख म्हणाले. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कुठेही वाद किंवा संभ्रमाचे वातावरण नाही. शरद पवार यांनी जेसीपीऐवजी न्यायालयीन चौकशी करावी इतकीच मागणी केली होती. काँग्रेसच्या जेसीपीच्या मागणीला समर्थन आहे असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा : Bawankule on Anil Deshmukh : शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा; देशमुखांच्या मागणीवरून बावनकुळेंचे माेठे विधान, म्हणाले, 'विरोधकांची भूमिका..'

ABOUT THE AUTHOR

...view details