महाराष्ट्र

maharashtra

रस्ता नसल्याने गाडी चिखलात फसली, आजारी मुलाचा दुचाकीवर मृत्यू

By

Published : Jul 27, 2022, 3:40 PM IST

शासकीय यंत्रणेची मान शरमेने झुकावी अशी घटना आज बुधवार (दि. 27 जुलै)रोजी गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे घडली. पोटात दुखू लागल्याने आठ वर्षीय मुलाला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना चिखलात गाडी अडकली. ती गाडी काढण्यात खूप वेळ गेला. यामुळे आजारी मुलाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याचा परिणाम त्या मुलाचा दुचाकीवरच प्राण गेला.

आजारी मुलाचा दुचाकीवर मृत्यू
आजारी मुलाचा दुचाकीवर मृत्यू

औरंगाबाद (गंगापूर) - शासकीय यंत्रणेची मान शरमेने झुकावी अशी घटना आज बुधवार (दि. 27 जुलै)रोजी गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे घडली. पोटात दुखू लागल्याने आठ वर्षीय मुलाला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना चिखलात गाडी अडकली. ती गाडी काढण्यात खूप वेळ गेला. यामुळे आजारी मुलाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याचा परिणाम त्या मुलाचा दुचाकीवरच प्राण गेला. वर्षानुवर्षे दुरुस्त होऊ न शकलेल्या या रस्त्याच्या दुरवस्थेने मुलाचा बळी घेतला. गंगापूर तालुक्यातील जुने लखमापूर ते लखमापूर रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा बाबुलाल परदेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

रस्त्यामुळे झाला मृत्यू -सकाळी सहा वाजता कृष्णा परदेशी या मुलाला उलटी झाली व पोटात दुखायला लागल्याने अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे कृष्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील बाबुलाल परदेशी हे मोटारसायकलवर निघाले. मात्र, वाटेतील चिखलात गाडी फसली. आधीच काळी माती आणि त्यात चिखल झालेल्या रस्त्यावर परदेशी यांनी तासभर झटूनही मोटारसायकल निघाली नाही. मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला मार्गउपलब्ध नव्हता. याच काळात वेळेवर उपचार मिळू न शकल्याने कृष्णाचा मोटरसायकलवरच मृत्यू झाला. या मुलावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वत्र संतापाची लाट -गंगापूर तालुक्यातील औरंगाबाद-पुणे महामार्गापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले लखमापूर हे गाव १९७२ साली जायकवाडी धरणामुळे पुनर्वसित झालेले आहे. सरकारे बदलली पण यंत्रणेचा कारभार गलिच्छ राहिल्याने जुने लखमापूर गावातील शेतात वस्तीकडे जाणाऱ्या व शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्याचे काम अजूनही झालेले नाही. गावात जाण्यासाठीही धड रस्ता नाही. चारचाकी, दुचाकी वर जाणे सोडा पायी चालणे देखील ग्रामस्थांसाठी जीवघेणे असते. गावात कोणी आजारी पडले किंवा महिलांची प्रसुती यावेळी ग्रामस्थांना देवाच्या भरोसे रहावे लागत आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे करत असताना देखील या गावाला अद्यापही रस्ता झाला नाही, मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी रस्त्याचा प्रश्न सोडविला नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा देखील या गावकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा -शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा प्रवास; पक्षातील बंडखोरीनंतर पुन्हा भरारीचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details