अकोला - कोरोना काळात वीजवितरण कंपनीने अतिरिक्त वीज बिल आकारून गोरगरीब नागरिकांची आर्थिक लूट केली आहे. वाढीव वीजबिल माफ करण्याऐवजी सरकार आता कारणे देत आहे. याविरोधात युवा मुक्ती आंदोलन संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत वीजबिलांची होळी केली.
वीजबील माफीसाठी युवा मुक्ती संघटनेने अकोल्यात केली बिलांची होळी
कोरोना लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांसाठी मीटर रिंडींग घेता आले नाहीत. त्यामुळे महावितरणने गेल्या वर्षीच्या या महिन्यांतील वीज वापराच्या आधारे ग्राहकांना बिले दिली आहेत. अनेकांना मोठ्या किमतीची वीज बिले आली आहेत. या विरोधात आता राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
वीज बील होळी
कोरोना काळात सरकारने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सरकारने आता आपला शब्द फिरवला आहे. त्यामुळे गोरगरिबांवर आर्थिक ताण आला आहे. अनेकांनी कर्ज काढून वीजबिल भरली आहेत. वाढीव बिले देऊन ग्राहकांची लूट केली जात आहे. त्याविरोधात युवा मुक्ती आंदोलन संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी वीजबिलांची होळी केली. हे आंदोलन संघटनेचे अध्यक्ष मनोज भालेराव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.