महाराष्ट्र

maharashtra

MLA Nitin Deshmukh : माझ्या जीवाला राज्य शासनाकडून धोका; आमदार नितीन देशमुख यांचा आरोप

By

Published : Apr 20, 2023, 8:35 PM IST

आपल्या जीवाला राज्य शासनाकडून धोका आहे, असा खळबळजनक आरोप बाळापूरचे ठाकरे गटाचे (उबाठा) आमदार नितीन देशमुख यांनी आज (गुरुवारी) केला आहे. काल नागपूर येथे नितीन देशमुख यांच्या जल आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी पोलिसांनी चर्चा केली होती. त्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्याने मला तुमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे, असा गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत केला आहे.

MLA Nitin Deshmukh PC Akola Today
नितीन देखमुख

आमदार नितीन देशमुख पत्रकार परिषदेत बोलताना

अकोला: आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी नागपूर येथून अकोल्यातील शासकीय विश्रामगृह परिसरात सोडले होते. दरम्यान, यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. त्यांचे जल आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव असल्याचेही देशमुख म्हणाले. राज्य शासनाने आपल्या बळाचा दुरुपयोग केल्याचाही आरोप देशमुखांनी केला. नागपूरची ही जलयात्रा राज्य शासनाने मोडून काढली असली तरी पुढच्या टप्प्यात खारपान पट्ट्यातील पाणी घेऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर 'जश्याच तसे' उत्तर देण्याची धमकी दिली असली तरी आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू, असे वक्तव्य नितीन देशमुख यांनी केले. ज्या पद्धतीने राज्य शासनाने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार म्हणजे दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यासारखे होते. आम्ही नागरिकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भावना ऐकून आमच्याशी संवाद साधायला हवा होता; मात्र त्यांनी ज्या पद्धतीने हे आंदोलन दपण्याचा प्रयत्न केला आहे, ही हुकूमशाही पद्धत आहे. याबाबत आम्ही कायदेशीर बाबींचा आधार घेऊन हे आंदोलन पुन्हा करू, असेही ते म्हणाले. परत वान धरणाच्या पाणीवरील स्थगिती उठवण्याची मागणी आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यात केली आहे.

आंदोलक ताब्यात: अकोला जिल्ह्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा नागपूर पोलिसांनी शहराच्या वेशीवर अडवून धरत काल बुधवारी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले होते. अकोला जिल्ह्यातील खारपानपट्ट्यात सुरू असलेली पाणीपुरवठा योजनेच्या कामाला स्थगिती दिल्याच्या विरोधात आमदार नितीन देशमुख यांनी ६९ गावातील खारं पाणी गोळा केले आणि ते खार पाणी अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाजण्यासाठी निघाले होते.

ग्रामस्थ हे गोड्या पाण्यापासून वंचित: पाणीपुरवठा योजनेत १५० कोटी रुपये खर्च झाले असून ८० टक्के कामही पूर्ण होते. मात्र, पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून योजना स्थगित केली. त्यामुळे खारपानपट्ट्यातील ६९ गावांमधील ग्रामस्थ हे गोड्या पाण्यापासून वंचित झाले आहेत. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ६९ गावातील लोकांनी संघर्ष यात्रा काढली आहे. तसेच सत्ता संघर्षाच्या वेळी एकनाथ शिंदें यांच्या सोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदार नितीन देशमुख परत आले होते. त्यावेळी नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तिथूनच नितीन देशमुख हे चर्चेत आले होते.

हेही वाचा:Electricity Demand Increased In Maharashtra: राज्यात सूर्य कोपला; उकाड्यामुळे विजेच्या मागणीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details