महाराष्ट्र

maharashtra

ST Workers strike : एसटीचे 98 वर्षीय पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांनी संपाबद्दल व्यक्त केली नाराजी

By

Published : Dec 4, 2021, 12:11 PM IST

लक्ष्मण केवटे
Laxman Kevate ()

सामान्य प्रवाशांना सेवा देणारी लालपरी बंद असल्याने सटीचे 98 वर्षीय निवृत्त पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांनी ( Laxman Kevate Reaction On ST Workers strike ) नाराजी व्यक्त केली. शासनाने जी पगारवाढ दिलीय ती स्वीकारून सामान्यांना सेवा दिली जावी, असे त्यांचे मत आहे.

अहमदनगर -प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन गाव तिथे एसटीया संकल्पनेतून चांदा ते बांदा प्रवाशांना सेवा देणारी सामान्यांची लालपरीची चाके सध्या जागेवर ( ST Workers strike )आहेत. सामान्य प्रवाशांना सेवा देणारी ही सेवा संपामुळे बंद असल्याबद्दल एसटीचे 98 वर्षीय निवृत्त पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे ( Laxman Kevate Reaction On ST Workers strike ) नाराज आहेत. शासनाने जी पगारवाढ दिलीय ती स्वीकारून सामान्यांना सेवा दिली जावी, असे त्यांचे मत आहे.

एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण शंकर केवटे यांची संपावर प्रतिक्रिया
आम्ही कधी संप केला नाही, कर्मचाऱ्यांनी ताणू नये -


एक जून 1948 आली पहिली एसटी धावली ती अहमदनगरहुन पुण्यासाठी. या एसटी बसचे चालक होते किसनराव राऊत तर वाहक होते लक्ष्मण केवटे. बस संपाच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने लक्ष्मण शंकर केवटे यांची मुलाखत घेतली. आमच्या काळात मुंबई राज्याने निर्णय घेतला आणि एसटी शासनाच्या अखत्यारीत घेतली. आम्ही खूप कमी पगारावर काम केली. आम्हाला केवळ 80 रुपये महिना पगार होता. मात्र, आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी संप सुरू केला आहे. आधीच कोरोना काळात एसटी ठप्प होती. पंढरपूर आदी यात्रा करता न आल्याने एसटीला मोठा भुर्दंड बसलेला आहे असे केवटे म्हणाले. एसटी आधीच तोट्यात असताना ऐन दिवाळीत संप करणे अगदी चुकीचे आहे. शासनाने आता तडजोड करत पगारवाढ दिली आहे. त्यामुळे कार्मचाऱ्यांनी कामावर परत आले पाहिजे, असे केवटे म्हणाले. शासनाने कडक कारवाई केली तर त्याचा फटका कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाना बसणार आहे. याभितीने अनेक कर्मचारी कामावर येत आहे, बाकीचे पण येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वाटेत एसटीचे लोकं स्वागत करत -

98 वर्षीय निवृत्त वाहक यांना पेन्शन नाही. मात्र, त्याबद्दल त्यांची नाराजी नाही. त्यावेळच्या मुंबई राज्यातील सरकारने खाजगी बसचे शासकीयकरण करत बाँबे स्टेट ट्रान्स्पोर्ट स्थापन केले. त्यात सर्वात आघाडी नगरच्या मदिना मोटर सर्व्हिसने घेत पाच बसेस नगर-पुणे मार्गावर सुरू केल्या. याबाबत जुन्या आठवणी सांगताना केवटे म्हणाले, की खाजगी वाहतुकीला पायबंद बसणार म्हणून आम्ही पुण्याहून पाच बस नगरला आणताना पोलीस बंदोबस्त दिला गेला होता. मात्र वाटेत महिलांनी बसला आणि आम्हाला ओवळत स्वागत केले. त्यावेळी नगरच्या माळीवाडा वेस येथील पटांगणातून पहिली बस 1 जून 1948 साली सकाळी सात वाजता सुटली. लक्ष्मीआई मंदिरासंमोर लिंबाच्या झाडाला एक मोठी घंटा बांधली होती. जुन्या झेडपी इमारती(तेंव्हाच लोकल बोर्ड) वरील घड्याळाच्या वेळेवर बस सुटत. घंटा वाजली की बस पुण्याकडे रवाना होत. त्यावेळचे वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरीकर यांनी बसला हार घालून नारळ फोडून उद्घाटन केले. चालक किसनराव राऊत आणि वाहक म्हणून पहिली बस पुण्याकडे काढली, त्यावेळी बसमध्ये तीस प्रवासी होते, अशी माहिती लक्ष्मण केवटे यांनी दिली. वाटेत अनेक ठिकाणी आमचे स्वागत झाले.निळ्या रंगातील शासकीय बस पाहण्यासाठी वाटेत लोक उभे होते. पुण्यातील शंकरशेठ रोडवर शेवटचा थांबा होता. सायंकाळी सात वाजता शेवटची बस पुण्याहून नगर कडे निघत, साधारण अडीच तीन तास प्रवासाला त्यावेळी लागत, असे केवटे यांनी सांगितले.

लालपरीचे चाके लवकर रस्त्यावर धावावीत -


एसटीही सामान्यांचा आधार आहे. पगारवाढ झाली पाहिजे, आम्ही 80 रुपये पगारावर काम केले. आता शासनाने पगारवाढ दिली आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे, आम्ही कधी संप केला नाही, असे लक्ष्मण केवटे यांचे मत आहे. संप लवकर मिटेल आणि एसटीची चाके रस्त्यांवर लवकरच दिसतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा -एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत ९३८४ कर्मचारी निलंबित तर, १९८० जणांची सेवासमाप्ती

ABOUT THE AUTHOR

...view details