महाराष्ट्र

maharashtra

Karnataka Election Result: कर्नाटक निकालाने देशभरात परिवर्तनाची सुरुवात - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

By

Published : May 13, 2023, 6:17 PM IST

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली आहे. या यात्रेच्या माध्यमातून लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेला हा मोठा प्रयत्न आहे. त्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकच्या निवडणुकीवर झाला असल्याचे आज जाहीर झालेल्या निकाला वरून दिसून येत असल्याचे, आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Karnataka Election Result
कर्नाटक विधानसभा निकाल

विजयानंतर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात

अहमदनगर: कर्नाटक मधील विजय हा मोठा असून तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातीभेदाचे राजकारण हे भारतीय नागरिकांना मान्य नसून, कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात व राज्यात काँग्रेसच्या सरकारची गरज आहे. भाजपाची आता घसरण सुरू झाली असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.



कार्यकर्त्यांनी केला जल्लोष: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात साजरा केला. यावेळी समवेत आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बाकोडे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकशाहीवर विश्वास असणारा काँग्रेस पक्ष: या विजयानंतर बोलताना काँग्रेस नेते थोरात म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर विश्वास असणारा पक्ष आहे. 2014 मध्ये भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे. भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून समाजात तेढ निर्माण करत आहे. यामुळे भारतातील नागरिक बंधू-भगिनी हे अस्वस्थ आहेत.




हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विजय: जनतेमधील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, 3560 किमीची केलेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली आहे. या यात्रेतून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी राहिली आहे.



आगामी काळात काँग्रेसचे सरकार: जनतेचा काँग्रेसवर मोठा विश्वास आहे. आगामी काळात देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी, देशाचा विकास घडवण्यासाठी, स्वायत्त संस्थांना पुन्हा स्वायत्तता देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गरजेचा आहे. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून देशात मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली. देशात व महाराष्ट्रातही परिवर्तन नक्की होणार असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर, फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

हेही वाचा -

  1. Congress Majority For Karnataka कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत 136 जागांवर विजय
  2. Karnataka Election Result 2023 महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का कर्नाटकातल्या मराठी भाषिकांचा काँग्रेसला कौल
  3. Karnataka Elections कर्नाटक काँग्रेसने उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली सर्व आमदारांना आजच बंगळुरुला आणणार

ABOUT THE AUTHOR

...view details