नवी दिल्ली : भोपाळ येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतीय नेमबाजांनी पाच पदके जिंकली आहेत. आज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने कांस्यपदक जिंकून भारताला गौरवान्वित केले. गुरुवारी पाटीलने नर्मदा नितीन राजूसह मिश्र स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. भारतीय नेमबाजांना चीनच्या नेमबाजांकडून 8-16 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय नेमबाजांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या खेळाडूंनी भारताला मिळवून दिले पदक :सरबज्योत सिंगने 22 मार्च (बुधवार) रोजी 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तर वरुण तोमर कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. वरुण तोमर हा बागपतचा रहिवासी आहे. आणि सरबज्योत सिंग हा हरियाणातील अंबाला येथील आहे. रिदम सांगवान आणि वरुण तोमर यांनीही एअर रायफल मिश्र स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. भारतीय नेमबाजांची शानदार कामगिरीमुळे नेमबाजी क्षेत्रात भारताचे उज्ज्वल भविष्य आज पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी विश्वचषकात शानदार कामगिरी करीत पदके पटकावली.
दिव्या सुब्बाराजूने गाठली रॅंकींग फेरी :दिव्या सुब्बाराजूने रँकिंग फेरी गाठली होती. पण, तिला पदक जिंकता आले नाही. चीनची नेमबाज ली जुई सुवर्ण, वेई कियान कांस्य आणि जर्मनीची डोरेन वेनेकॅम्पने रौप्यपदक जिंकण्यात यश मिळविले. भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत. नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत जगातील 33 देश सहभागी होत आहेत. या देशांचे ३२५ नेमबाज पदक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहेत.
आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा :ISSF विश्वचषक स्पर्धेत अझरबैजान, अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, झेक प्रजासत्ताक, ब्राझील, इस्रायल, बोस्निया, हर्जेगोविना, डेन्मार्क, बांगलादेश, इराण, कझाकस्तान, फ्रान्स, यूके, किर्गिस्तान, कोरिया, लिथुआनिया, हंगेरी, मेक्सिको हे देश सहभागी होणार आहेत. सौदी अरेबिया, रोमानिया, मालदीव, सिंगापूर, श्रीलंका, सर्बिया, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि उझबेकिस्तान या देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
हेही वाचा : IPL 2023 Captain : आयपीएल 16 मध्ये हे खेळाडू असणार कर्णधार; जाणून घ्या आतापर्यंतचा यशस्वी कॅप्टन कोण