चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे कोलकाता नाईट रायडर्सच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून आणला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सूर्यकुमार यादव ५६ आणि रोहित शर्मा ४३ यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५२ धावा केल्या होत्या. या माफक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. नितीश राणा ५७ आणि शुबमन गिल ३३ यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि मुंबईने हा सामना १० धावांनी जिंकला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने, आपल्या गोलंदाजांचे कौतूक केलं.
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'केकेआरकडून ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू होती. ती पाहता आम्ही सामन्यात शानदार वापसी केली. गोलंदाजीसाठी आलेल्या प्रत्येक जण संघासाठी योगदान देऊ इच्छित होता. या विजयाने आमच्या आत्मविश्वासात भर पडेल. अनेक गोष्टी सकारात्मक राहिल्या.'
पुढे रोहित म्हणाला, केकेआरने सुरूवातीच्या पहिल्या ६ षटकात चांगली फलंदाजी केली. पण पॉवर प्लेनंतर राहुल चहरने महत्वाची विकेट्स घेत आम्हाला सामन्यात वापसी करून दिली. कृणालने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रामाणिकपणे मी सर्व गोलंदाजांचे कौतूक करतो. त्यांनी संघासाठी आपलं मोलाचं योगदान दिले.