विशाखापट्टणम IND vs AUS 1st T-20 :अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 209 धावांचं आव्हान भारतानं अखेरच्या चेंडूवर दोन गडी राखून पूर्ण केलं. फिनिशर रिंकूनं षटकार ठोकत भारताला विजयी केलं. तत्पुर्वी पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी आक्रमक अर्धशतकं ठोकली. तर ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू तनवीर संघानं दोन बळी घेतले. कांगारुंनी जोश इंग्लिंशनं ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारतानं हे आव्हान दोन गडी राखून सहज पार केलं.
ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर : भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भारतीय संघाचे गोलंदाज आपल्या कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवू शकले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं आपल्या निर्धारित 20 षटकांत 3 विकेट गमावत 208 धावांचा डोंगर उभारला. जोश इंग्लिशनं भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत 50 चेंडूंत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 110 धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह स्मिथनंही अर्धशतक केल. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताचा ऐतिहासिक पाठलाग : कांगारुंनी दिलेल्या 209 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं 2 गडी लवकर गमावले तरीही ऑस्ट्रेलियाला सामन्यावर पकड मिळवता आली नाही. भारतीय संघाला पहिला धक्का पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धावबादच्या रुपात बसला. जयस्वाल याच्याशी विसंवाद गायकवाड धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकात यशस्वी जैस्वाल 21 (8 चेंडू) धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मॅथ्यू शॉर्टचा बळी ठरला. जैस्वालनं आपल्या छोट्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. मात्र 13व्या षटकात ईशानला तनवीर संघानं बाद करत ही जोडी तोडली. किशननं 39 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 58 धावांची खेळी केली. यानंतर 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर 12 धावा काढून टिलक वर्मालाही तनवीर संघानं बाद केलं. शतकाकडं वाटचाल करणारा कर्णधार सूर्यकुमार यादवही 18व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फचा बळी ठरला. सूर्यानं 42 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 80 धावांची खेळी केली. पण रिंकू सिंगनं शेवटपर्यंत टिकून राहात शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजयी केलं आणि भारताच्या टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात मोठं लक्ष्य गाठण्यास मदत केली.