नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ भारतात यशस्वीरित्या पार पडला. भारतीय संघानं स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व सामने आणि उपांत्य फेरीचा सामना जिंकला, मात्र अंतिम फेरीत संघाचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियानं भारताचं तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंग केलं. या पराभवामुळे टीम इंडियाचे खेळाडू आणि चाहते फार निराश झाले आहेत. या काळात भारतीय चाहत्यांनी त्यांच्या संघाला भक्कम पाठिंबा दिला. चाहत्यांनी विश्वचषकाच्या इतिहासात आजतागायत न झालेला विक्रम रचला आहे.
स्टेडियममध्ये सर्वाधिक चाहते आले : आयसीसीनं नुकतीच एक आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, विश्वचषकाच्या इतिहासात कधीच इतके चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी गेले नव्हते. यावेळी विश्वचषक २०२३ मध्ये तब्बल १२ लाख ५० हजार ३०७ लोकांनी स्टेडियममध्ये आपली उपस्थिती नोंदवली. हा डेटा संपूर्ण विश्वचषकातील ४८ सामन्यांचा आहे. यामध्ये भारताच्या सामन्यांसह इतर संघांच्या सामन्यांचाही समावेश आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर २ सामने झाले : वैशिष्ट्याची बाब म्हणजे, १२ लाख ५० हजारांच्या या आकडेवारीपैकी २.५० लाख लोक फक्त दोन सामन्यांसाठी उपस्थित होते! प्रथम, १४ ऑगस्ट रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला १.२५ लाखांहून अधिक चाहत्यांनी हजेरी लावली. तर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम सामन्यालाही १.२५ लाखांहून अधिक चाहते उपस्थित होते. हे दोन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाले. हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून, येथे १.३० लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.
भारताचा फायनलमध्ये पराभव : भारत-पाकिस्तान आणि भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम खचाखच भरलं होतं. भारतानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला होता. ग्रुप स्टेजचे सर्व सामने जिंकल्यानंतर टीम इंडियानं उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. मात्र भारताला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा :
- विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मैदानात घुसलेला पॅलेस्टाईक समर्थक होता तरी कोण?
- रडवेल्या भारतीय संघाला मोदींनी घेतलं कवेत; वर्ल्डकप पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले मोदी, शमीची भावनिक पोस्ट
- सिराज रडला, रोहितलाही अश्रू आवरले नाहीत; पाहा भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅचचे इमोशनल Photos