अहमदाबाद - येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये रंगलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय फिरकीपुढे इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर आटोपला. अक्षर-अश्विन-सुंदर या फिरकी तिकडीने ८ गडी बाद करत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. परंतु भारतीय संघालाही एक धक्का बसला. भारतीय डावाच्या पहिल्या षटकात जेम्स अँडरसनने शुबमन गिलला (०) पायचित केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने किल्ला लढवला. भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेर १ बाद २४ धावा केल्या आहेत. रोहित ८ तर पुजारा १५ धावांवर नाबाद राहिला.
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला. अक्षर पटेल याने आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ले (२) याला त्रिफळाचीत केले. सिब्लेच्या पाठोपाठ अक्षरने जॅक क्राउली याला बाद केले. त्याने क्राउलीला सिराजकडे झेल देण्यास भाग पाडले. क्रॉउलीने ९ धावा केल्या. त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सिराजने रुटला पाच धावांवर पायचीत करत इंग्लंडला जबर धक्का दिला. तेव्हा इंग्लंडची अवस्था ३ बाद ३० अशी झाली.