महाराष्ट्र

maharashtra

पुलित्झर पुरस्कार: राष्ट्रवाद आणि पत्रकारिता..

By

Published : May 6, 2020, 5:59 PM IST

पुलित्झर पुरस्काराने तीनही छायाचित्रकारांचा त्यांच्या कामाबद्दल गौरव झाला आहे. मात्र पुरस्कार देताना संयोजकांनी जम्मू काश्मीरचे वर्णन 'ताब्यात घेतलेला प्रदेश' असे केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान छायाचित्रकारांच्या अभिनंदनासाठी राहुल गांधीनी केलेल्या ट्वीटकडे देखील राजकीय अंगाने पहिले जात असून त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात येत आहे..

Pulitzer Prize: Nationalism and Journalism
पुलित्झर पुरस्कार: राष्ट्रवाद आणि पत्रकारिता..

युद्धजन्य क्षेत्रात किंवा सातत्याने संघर्ष होत असलेल्या भूमीत व्यावसायिक कर्तव्ये पार पडताना पत्रकारांना नेहमीच आपल्या जीवाची बाजी लावून काम करावे लागते. पत्रकार विश्वसनीय माहितीच्या आधारे बातमी लिहीत असतात/वार्तांकन करीत असतात तर छायाचित्रकार त्यांच्या लेन्सद्वारे चांगले छायाचित्र/ फोटो घेत असतात. लोकांच्या मनाला भिडणारे छायाचित्र घेण्यासाठी छायाचित्रकाराला फक्त पत्रकारितेचे कौशल्यच नव्हे तर मोठे धैर्य दाखविणे देखील जरुरी असते.

पत्रकारिता करताना दाखविलेल्या धैर्यासाठी कधीकधी मोठी किंमत चुकवावी लागू शकते. जशी की मुश्ताक अली या काश्मिरी फोटोग्राफरला चुकवावी लागली. मुश्ताक त्याचा सहकारी पत्रकार युसुफ जमील यांनी लिहिलेल्या बातमीसाठी काम करत असताना पार्सल बॉम्ब स्फोटात ठार झाला होता. त्याचप्रमाणे हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदीप भाटिया या छायाचित्रकाराला देखील एका बातमीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केल्याने कार बॉम्ब स्फोटात आपला जीव गमवावा लागला.

जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर ५ ऑगस्ट २०१९ रोजी वार्तांकन केल्याबद्दल तीन सहकारी पत्रकार छायाचित्रकार मुख्तार खान, दार यासीन आणि चन्नी आनंद यांना प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर काश्मीरचे चित्र दर्शविणारी छायाचित्रे घेतल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी ज्या परिस्थितीत ही छायाचित्रे घेतली त्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.

एका डोळ्याला जखम झालेल्या 6 वर्षाच्या मुलीच्या चित्रामधून तेथील मुले राजकीय संघर्षात कशी भरडली जातात हे दर्शविते. हे चित्र या प्रदेशातील मुलांच्या एकूणच असुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते.

श्रीनगरयेथील वाहनतळावर विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत असलेला निषेध मोडून काढताना सशस्त्र सेना दल किती असंवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत आहे हे दुसऱ्या छायाचित्रातून स्पष्ट होते.

काश्मीरच्या ग्रामीण भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांच्या दरम्यान चालणाऱ्या चकमकी हा नित्याचा भाग आहे. मात्र त्यामुळे आपल्या घराचे नुकसान झाल्यानंतर ती घाण साफ करताना घेतलेले छायाचित्र पुलित्झर पुरस्काराचे तिसरे मानकरी ठरले आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसात स्थानिकांना आपल्या घराची डागडुजी करावी लागते यावरून त्यांच्या असुरक्षित आणि अनिश्चित जीवनाचे कटू वास्तव समोर येते.

निषेध व्यक्त करणाऱ्या महिला, प्रार्थना करणाऱ्या स्त्रिया किंवा पवित्र कुराणचे पठण करणाऱ्या मुलींच्या छायाचित्रांकडे कसे पाहावे हे ते बघणाऱ्यावर अवलंबुन आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अस्थिरता असलेल्या भागात महिलांची होणारी कुचंबणा किंवा दुर्दशा दिसून येईल. तर धार्मिक दृष्टीने बघितल्यास अशा परिस्थितीत देखील इस्लामिक कट्टरपंथीयता दिसू शकते जे आजकाल नव्याने उदयाला आलेल्या आणि पत्रकार म्हणवणाऱ्यांना कायमच वाटत आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही छायाचित्रे तेथील विदारकतेचे वास्तव दर्शविणारी असल्याने प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर होऊन देखील त्याचा आनंद साजरा करण्याचा छायाचित्रकारांना हक्क नसल्याचे एका वर्गाला वाटते हे खूपच विचित्र आहे.

पुलित्झर पुरस्काराने तीनही छायाचित्रकारांचा त्यांच्या कामाबद्दल गौरव झाला आहे. मात्र पुरस्कार देताना संयोजकांनी जम्मू काश्मीरचे वर्णन 'ताब्यात घेतलेला प्रदेश' असे केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान छायाचित्रकारांच्या अभिनंदनासाठी राहुल गांधीनी केलेल्या ट्वीटकडे देखील राजकीय अंगाने पहिले जात असून त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या कौतुकामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात येत आहे.

या सगळ्यामुळे या छायाचित्रकारांना भारतीय छायाचित्रकार म्हणून पाहावे की काश्मिरी छायाचित्रकार असा नवा वाद निर्माण झाला आहे. महत्वाचे म्हणजे राहुल गांधींनी या तिघांचे अभिनंदन करताना 'भारतीय' या शब्दावर जोर दिला आहे. तर ओमर यांच्या ट्विटमध्ये मात्र याकडे दुर्लक्ष करून तेथील परिस्थितीचे वर्णन केल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. या सगळ्या वादामुळे जगातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळून देखील त्याचा आनंद साजरा करण्याऐवजी ट्विटमधील नवनवीन अर्थ काढून लोकांना गोंधळात टाकण्यात येत आहे.

- बिलाल भट.

ABOUT THE AUTHOR

...view details