महाराष्ट्र

maharashtra

Kargil Vijay Diwas : कारगीलमध्ये जवानांनी शत्रूंच्या छातीवर फडकवला तिरंगा, कारगिल विजय दिनी राजनाथ सिंह झाले नतमस्तक

By

Published : Jul 26, 2023, 12:32 PM IST

Updated : Jul 27, 2023, 7:26 AM IST

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी लडाखला भेट देत 1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण केली. कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस कार्यक्रमात भारताच्या शूर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

Kargil Vijay Diwas
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

लडाख : पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याला भारत मातेच्या सुपूत्रांनी चोख उत्तर देत हुसकावून लावले. मात्र कारगिल युद्धात अनेक भारतीय जवानांना पाकिस्तानचा हल्ला परतवून लावताना वीर मरण पत्करावे लागले. देशाच्या या शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिन आयोजित करण्यात येतो. आज राजनाथ सिंह यांनी कारगिल येथे शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कारगिलच्या युद्ध स्मारकावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुष्पहार अर्पण केला.

जवानांनी शत्रूंच्या छातीवर फडकवला तिरंगा :लडाखमध्ये भारताच्या रक्षणासाठी देशाच्या जवानांनी 1999 मध्ये दाखवलेले शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. आज आपण आपल्या जवानांमुळेच मोकळा श्वास घेऊ शकतो. शून्य डिग्रीपेक्षा कमी तापमानात ऑक्सिजनची कमतरता असतानाही आपल्या सैनिकांनी कधीही बंदुका खाली केल्या नाहीत. 1999 मध्ये भारताच्या सैनिकांनी आपल्या शौर्य गाजवत शत्रूंच्या छातीवर तिरंगा फडकवला होता. त्यामुळेच आज कारगिलमध्ये भारताचा ध्वज मानाने फडकत असल्याचेही राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. हा दिवस भारताच्या अतुलनीय योद्धांच्या शौर्याला समोर आणतो जे नेहमीच देशातील लोकांसाठी प्रेरणास्थान राहतील, असे पंतप्रधानांनी हिंदीत ट्विटमध्ये म्हटले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी वाहिली आदरांजली :लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना पुष्पांजली अर्पण केली. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनीही शूरवीरांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनीही कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण केला.

प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या नातेवाईकांची उपस्थिती :कारगिलमध्ये सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांचे स्मरण करण्यासाठी कारगिल युद्ध स्मारकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारगिल लढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांचे नातेवाईकही उपस्थित होते.

कारगिल विजय दिवस :कारगिल येथे 1999 मध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारत मातेच्या शूर जवानांनी मोठ्या धैर्याने लढा दिला. त्यामुळे दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस आयोजित केला जातो. युद्धादरम्यान भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचे स्मरण म्हणून या दिवशी भारताच्या शूर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येते. पाकिस्तानी सशस्त्र दलांनी लडाख प्रदेशातील कारगिल, द्रास आणि बटालिक सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरी करत हल्ला केला होता.

Last Updated : Jul 27, 2023, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details