महाराष्ट्र

maharashtra

पाकिस्तानमधून आंदोलक शेतकऱ्यांवर ड्रोनने हल्ल्याची भीती, अमरिंदर सिंग यांचे पंतप्रधानांना पत्र

By

Published : Jul 16, 2021, 8:10 PM IST

सीमेपलीकडून दहशतवादी हे शेतकऱ्यांच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात. पंजाबला मोठी आंतरराष्ट्रीय सीमा आहे, याकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले

अमरिंदर सिंग यांचे पंतप्रधानांना पत्र
अमरिंदर सिंग यांचे पंतप्रधानांना पत्र

चंदीगड -सीमेपलीकडून (पाकिस्तानमधून) ड्रोनच्या हल्ल्यांचा धोका वाढला आहे. आयएसआय ग्रुपकडून समर्थन असलेले दहशतवादी, खलिस्तानी ग्रुप हे शेतकरी नेत्यांना लक्ष्य करू शकतात, अशी भीती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबरोबर संवादाला सुरुवात करावी व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

पंजाबमधील सर्वपक्षीय प्रतिनिधी हे पंतप्रधानांशी चर्चा करून आंदोलक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्याकरिता तयार असल्याचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दीर्घकाळ चाललेल्या शेतकरी आंदोलनाने सामाजिक एकता आणि आर्थिक स्थितीला धोका उत्पन्न होत आहे. सीमेपलीकडून दहशतवादी हे शेतकऱयांच्या भावनांचा फायदा घेऊ शकतात. पंजाबला मोठी आंतरराष्ट्रीय सीमा आहे, याकडेही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

हेही वाचा-संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

गुप्तचर विभागाने दहशतवादी हल्ल्याचा दिला इशारा-

भारत-पाकच्या सीमेलगत असलेल्या पंजाबमधील गावांमध्ये ड्रोनच्या हालचाली वाढल्याचे आढळले आहे. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे हेरॉईन आणि शस्त्रास्त्रे पाठविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांनी पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अशा स्थितीत आयएसआयचा पाठिंबा असलेली खलिस्तानी आणि काश्मिरी दहशतवादी गट हे पंजाबमध्ये कारवाया करण्याचे नियोजन करत आहेत. ही माहिती गुप्तचर विभागाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

हेही वाचा-भाजपला घाबरणाऱ्यांना पक्षाबाहेर हाकला, आपल्याला निडर लोक हवेत - राहुल गांधी

तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ही दिल्लीच्या सीमांवर सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चेच्या काही बैठकी झाल्या आहेत. मात्र या बैठकी दुर्दैवाने यशस्वी झाल्या नाहीत, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details