नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट तसेच ठाकरे गटाचा युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला आहे. सत्तासंघर्षाच्या या सुनावणी दरम्यान, सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांसंदर्भात वक्तव्य केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षातील 13 नेत्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रपतींनी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे.
पत्रात काय लिहिलंय? : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षची सुनावणी डी. वाय. चंद्रचूड करत आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणी काही प्रतिक्रियाही दिल्या होत्या. सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांची टिप्पणी समोर येताच सोशल मीडियावर ट्रोल आर्मींनी त्यांचा पाठलाग केला. ट्रोल करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारबद्दल सहानुभूती आहे, त्यामुळे त्यांनी सरन्यायाधीशांवर निशाणा साधला आहे, असे या पत्रात लिहिले आहे. पत्रानुसार ट्रोल करणाऱ्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. लाखो लोकांनी असे ट्विट पाहिले आहेत, असे विरोधी पक्षातील नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले. दरम्यान, हे पत्र १६ मार्च रोजी लिहिले होते.
पत्रात या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या : पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, विवेक तंखा, शक्ती सिंह गोहिल, प्रमोद तिवारी, आम याज्ञिक, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी आणि आपचे राघव चढ्ढा, उद्धव गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, सपाच्या जया बच्चन आणि रामगोपाल यादव यांचा समावेश आहे. याच मुद्द्यावर विवेक तनखा यांनी भारत सरकारच्या अॅटर्नी जनरल यांना स्वतंत्र पत्रही लिहिले आहे.