ETV Bharat / state

गटशेतीतून समृद्धी; पाणी फाउंडेशनकडून मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना विकासाची प्रेरणा - Paani Foundation Program

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 9:38 PM IST

Paani Foundation Program : आज पारंपरिक शेती किफायतशीर राहिली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागेल. अनेक आदिवासी तरूण आधुनिक शेतीकडं वळत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीनं 'गटशेती प्रकल्प' उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना पाणी फाउंडेशनचा (Paani Foundation) माध्यमातून खास प्रशिक्षण देण्यात आले.

Paani Foundation
पाणी फाउंडेशन (Maharashtra Desk)

मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनसाठी पाणी फाउंडेशनचा उपक्रम (Amravati Reporter)

अमरावती Paani Foundation Program : निसर्ग आणि बाजार भाव हे शेतकऱ्यांच्या हाती नसले तरी, उत्पन्नावर होणारा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे शक्य आहे, हे गणित जमलं तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो. विशेष म्हणजे "मेळघाटात आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती केली तर आदिवासी शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी नांदू शकेल" असा संदेश देत गटशेती करण्याबाबत प्रेरणा देण्याचं काम पाणी फाउंडेशनच्या (Paani Foundation) वतीनं मेळघाटात केलं जात आहे. विशेष म्हणजे गत दोन-तीन वर्षांपासून पाणी फाउंडेशनचा उपक्रम यशस्वी होत आहे. यावर्षी मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी खास प्रशिक्षण घेऊन आता नव्या दमानं गटशेती करण्यासाठी तयारी सुरू केलीय.


शेतकऱ्यांना दिला जातो खास मान : शेतकरी समृद्ध व्हावा हा पाणी फाउंडेशनचा मुख्य उद्देश असून राज्यात एकूण 14 ठिकाणी सलग दोन महिने शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील पाय विहीर या ठिकाणी असणाऱ्या प्रशिक्षण शिबिरात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका आणि मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. शेतकऱ्यांचे विविध गट पाडून प्रत्येकी अडीच दिवसांचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रशिक्षणार्थी शेतकऱ्याचे पाय धूऊन आणि औक्षण करून त्यांचे प्रशिक्षण केंद्रात स्वागत करण्यात आले. या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पाणी फाउंडेशनच्या वतीनं मोफत करण्यात आल्याची माहिती, पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुक्याचे समन्वयक वैभव नायसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.



गटशेती ही शेतकऱ्यांसाठी आनंददायी : शेतकरी म्हटलं की, कष्ट आणि दुःख असं चित्र उभं केलं जातं. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण फार गंभीर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून समृद्ध करण्याचा पाणी फाउंडेशनचा प्रयत्न आहे. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिलांना आपण जणू माहेरी चाललो आहोत असं वाटत होतं. एकूणच ही चळवळ शेतकऱ्यांचे आयुष्य पालटणारी आहे असं, पाणी फाउंडेशनचे तांत्रिक प्रशिक्षक सतीश अंभोरे यांनी सांगितलंय.



फार्मर कपमध्ये मेळघाटच्या गावाने मारली बाजी : पाणी फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी 'सत्यमेव जयते फार्मर कपच' आयोजन करण्यात येतं. गतवर्षी मेळघाटातील कुलंगणा बुद्रुक या गावानं एक लाख रुपयांचे पारितोषिक या स्पर्धे अंतर्गत पटकावलं होतं. यावर्षी महाराष्ट्रात एकूण 46 तालुक्यांमध्ये 'सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा' सुरू झालीय. या स्पर्धेमुळं शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवले. विशेष म्हणजे उत्पन्न वाढवण्यासोबतच उत्पन्नावरील खर्च कमी करण्यात आलाय. एकूणच पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामुळं कृषी क्षेत्रात एक नवी चळवळ सुरू झाल्याची माहिती, पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षक पंढरी इंगळे यांनी सांगितलं.



मेळघाटातील 235 हून अधिक शेतकरी प्रशिक्षित : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या 53 गावांमधून एकूण 235 पेक्षा अधिक महिला आणि पुरुष शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. विशेष म्हणजे महिला बचत गट एकत्रित येऊन गटशेती करायला लागल्या तर मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती झपाटाने पालटण्यास मदत होईल असा विश्वास, पाणी फाउंडेशनचे चिखलदरा तालुका समन्वयक वैभव नायसे यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा -

  1. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी वाशिम जिल्ह्यात अष्टसूत्री कार्यक्रम; आमिर खान यांच्याकडून कौतुक
  2. बारामती तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना यश; 'या' 27 गावांचा पाणी प्रश्न सुटला
  3. पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा ; सोलापुरातील सुर्डी गाव राज्यात प्रथम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.