पंढरपूर (सोलापूर) - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला. त्याचा अध्यादेश अद्यापही राज्य सरकारने काढला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जयंत पाटील यांनी फसवणूक केली आहे. यासंदर्भात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. अन्यथा जनहीत शेतकरी संघटना मंत्रालय किंवा जयंत पाटील यांच्या बंगल्यात घुसल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा जनहीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्य शासनाला दिला आहे.
'जयंत पाटलांविरूद्ध गुन्हा दाखल करा'
'19 मे रोजी जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर येऊन उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द करत आहे, असे सांगितले. मात्र सात दिवस झाल्यानंतरही राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढण्यात आला नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांच्या विरोधात त्वरित टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. या मागणीचेे निवेदन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहे. संघटनेचे कार्यकर्ते मुंबई येथील मंत्रालय किंवा मंत्री जयंत पाटील यांच्या घरात गनिमी काव्याने घुसू', असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.
जनहीत शेतकरी संघटनेकडून 16 दिवसांपासून उपोषण सुरू
उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी 5 टीएमसी पाणी मंजूर केलेला अध्यादेश रद्द करा, या मागणीसाठी जनहीत शेतकरी संघटना उजनी धरण परिसरातील भिमानगर येथे 16 दिवसांपासून आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी 19 मे रोजी 5 टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द केला. याची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. मात्र, अद्यापही सरकारने अध्यादेश काढला नाही. त्यानंतर जनहीत शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून बोंबाबोंब आंदोलन केले होते. मात्र राज्य सरकारकडून उजनी संदर्भात कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढला नाही. त्यामुळे आताा जनहीत शेतकरी संघटना आक्रमक झाली. आहे.
हेही वाचा - राज्यात 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 453 मृत्यू